राज्यात गेल्या 9 महिन्यांत 11532 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू; समृद्धी महामार्गाची आकडेवारी चिंतेत टाकणारी
Maharashtra road accidents : राज्यात गेल्या 9 महिन्यांत 11532 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू; समृद्धी महामार्गाची आकडेवारी चिंतेत टाकणारी
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात गेल्या 9 महिन्यांत 11532 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू
समृद्धी महामार्गाची आकडेवारी चिंतेत टाकणारी
मुंबई : राज्यातील रस्ते सुरक्षेची स्थिती पुन्हा चिंताजनक बनली असून, जानेवारी ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अपघात आणि मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. परिवहन विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, या नऊ महिन्यांत राज्यात तब्बल 10 हजार 720 अपघात घडले. या भीषण घटनांमध्ये 11 हजार 532 नागरिकांचा बळी गेला.
राज्यातील अपघातांमध्ये सर्वाधिक घटना मुंबईत नोंदविण्यात आल्या आहेत. दैनंदिन वाहतुकीचा ताण, वाढती वाहनसंख्या आणि रस्त्यांवरील वाढलेले दाब यामुळे 2025 मधील अपघातांचे प्रमाण 2024 च्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून आले. मुंबईत याच कालावधीत तब्बल 1,878 अपघात झाले असून, त्यात 262 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, राज्यातील सर्वाधिक मृत्यू पुणे ग्रामीण भागात झाले आहेत. ग्रामीण पट्ट्यातील रस्त्यांची धोकादायक स्थिती, वेगमर्यादांचे उल्लंघन आणि अव्यवस्थित वाहतूक यामुळे एकूण 764 जणांचा जीव गेला आहे. त्यामुळे ग्रामीण रस्त्यांवरील सुरक्षाव्यवस्थेची उणीव पुन्हा अधोरेखित झाली आहे.
मुंबई–पुणे महामार्गावर अपघातांचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी महामार्गावर कॅमेरे आणि इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमची उभारणी करण्यात आली. वेग नियंत्रक उपाययोजना आणि तात्काळ कारवाईमुळे या महामार्गावरील अपघातात काही प्रमाणात घट झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, याच्या उलट परिस्थिती समृद्धी महामार्गावर दिसून येते. या महत्त्वाच्या द्रुतगती मार्गावर कोणतीही स्मार्ट सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. वाहनांची संख्या वाढत असताना आवश्यक सुरक्षायंत्रणा सुरू न राहिल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत चालल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.










