मुंबईहून सुट्टी एन्जॉय करायला गेले मालवणला, एकाच वेळी खाणीत बुडाले 5 जण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये खाणीच्या पाण्यात आंघोळ करताना पाच जण बुडाल्याची धक्कादायक घटना आहे. ज्यामध्ये 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून चौघांना वाचविण्यात यश आलं.
ADVERTISEMENT

भरत केसरकर, मालवण (सिंधुदुर्ग): कुंभारमाठ गोवेकरवाडी रस्त्यालगत असलेल्या चिरेखाणीच्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी उतरलेले पाच जण बुडल्याची दुर्घटना सोमवार (3 नोव्हेंबर 2025) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. यात 16 वर्षीय करिश्मा सुनील पाटील हिचा बुडून मृत्यू झाला, तर उर्वरित चार जणांना स्थानिक तरुणाच्या मदतीने वाचवण्यात यश आले. यातील एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला प्रथम ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अन्य तीन जण सुखरूप आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी सुट्टीसाठी मुंबईवरून कुंभारमाठ गोवेकरवाडी येथील भानुदास लोंढे यांच्या घरी आलेले कुटुंबीय हे अपघाताचे बळी ठरले. यात अंजली प्रकाश गुरव (वय 30), गौरी प्रकाश गुरव (वय 18), गौरव प्रकाश गुरव (वय 21), करिश्मा सुनील पाटील (वय 16) आणि दुर्वेश रवींद्र पाटील (वय 9) हे पाचजण होते. सायंकाळी पाच वाजता ते गोवेकरवाडी रस्त्यालगतच्या चिरेखाणीतील पाण्यात आंघोळ करण्यासाठी उतरले. पाण्याची खोली आणि वेगाचा अंदाज न आल्याने ते एकाएकी बुडू लागले.
हे ही वाचा>> रायगड हादरलं! पोटच्या लेकरांनीच 'त्या' एका कारणासाठी आईवडिलांची केली हत्या, मृतदेह दोन दिवस कुजलेल्या अवस्थेत खोलीत
हा प्रकार रस्त्यावरून जात असलेल्या राहुल भिसे या तरुणाच्या लक्षात आला. त्याने त्वरित पाण्यात उडी घेऊन बुडणाऱ्या अंजली गुरवसह अन्य मुलांना बाहेर काढले. मात्र, करिश्मा पाटील ही पाण्यात बुडून बेपत्ता झाली. शोध घेतल्यानंतर तिचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थांनी मदत कार्य सुरू केले.
गंभीर जखमी झालेल्या अंजली गुरव हिला प्रथम कुंभारमाठ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर नसल्याने तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. गौरी, गौरव आणि दुर्वेश हे तिघे सुखरूप असून, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.










