
इसरार चिश्ती,प्रतिनिधी (औरंगाबाद)
Jalana Daughter Murder: जालना: स्वत:च्या पोटच्या मुलीचा आपल्याच हाताने गळा आवळून हत्या (Murder) केल्याची अत्यंत धक्कादायक घटना जालन्यातील (Jalna) पीर-पिंपळगाव या गावात घडली आहे. तसंच या हत्येमागचं कारणंही तेवढंच भयंकर आहे. मुलगी आपल्याच नात्यातील एका मुलासोबत घरातून पळून गेल्याने झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बापाने मुलीची ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे जालन्यात 'सैराट'ची (Sairat) पुनरावृत्ती झाल्याची सध्या चर्चा आहे. (sairat in jalna for reputation father strangles daughter deadbody is also burnt in farm)
मुलगी नात्यातील मुलाबरोबरच न सांगता घरातून निघून गेल्याने समाजात बदनामी झाली. या रागाचा ज्वालामुखी हा बापाच्या मनात धगधगत होता. त्यातच पळून गेलेली मुलगी ही जेव्हा घरी परतली तेव्हा बापाने मागचा-पुढचा काहीही विचार न करता थेट मुलीचा गळा आवळून तिची निर्दयीपणे हत्या केली. निर्दयी बाप एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने आपल्या मुलीचा मृतदेह जवळच्याच शेतात नेऊन थेट जाळून टाकला आणि तिथेच तिचा अंत्यविधी देखील आटोपला.
मयत तरुणी सूर्यकला उर्फ सुरेखा ही तीन दिवसांपूर्वी घरातून निघून गेली होती. ती घरी आली तेव्हा असं समजलं की, ती तिच्या एका जवळच्याच नातेवाईकाच्या मुलाबरोबर पळून गेली होती. जेव्हा ही माहिती तिच्या वडिलांना समजली तेव्हाच त्यांनी गावात होणाऱ्या बदनामीच्या भीतीने आपल्या भावाच्या मदतीने मुलीचा कायमचा काटा काढला. लागलीच मुलीचा अंत्यविधी देखील आटोपला पण जेव्हा गावातील लोकांना या गोष्टीची कुणकुण लागली तेव्हा त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. ज्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
याच हत्येप्रकरणी पोलिसांनी मयत मुलीचे वडील संतोष सरोदे आणि तिचे काका नामदेव सरोदे यांच्या विरोधात चंदनजीरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी असंही सांगितलं की, मुलगी ज्या मुलासोबत पळून गेली होती त्याच्यासोबत लग्न देखील करणार होती.
'ते जवळपास लग्नच करणार होते. पण वयाची अडचण होती. लग्नाच्या अनुषंगाने जी काही मागणी होती त्यामुळे 13 तारखेला होणारं लग्न त्या दिवशी झालं नाही. लग्न हे मोठ्या स्वरुपात करणार नव्हते. ते एका मंदिरात जाऊनच लग्न करणार होते. परंतु त्या दिवशी काही लग्न झालं नाही. दुसरीकडे गावात घरातून मुलगी निघून गेली याची जोरदार चर्चा झाली. याचाच अपमान मुलीचे वडील, तिचा चुलता आणि त्यांच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात वाटला. त्यामुळेच त्यांनी हे कृत्य केलं.' अशी माहिती यावेळी जालना पोलिसांनी दिली.
एकीकडे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून देशभरात गाजावाजा केला जातो. मात्र, याच महाराष्ट्रात जेव्हा फक्त बदनामीच्या भीतीने पोटच्या मुलीचा जीव घेतला जातो तेव्हा मात्र, या पुरोगामित्वाला नक्कीच तडा जातो. अशावेळी आजही मुलींना दिलं जाणारं मर्यादित स्वातंत्र हे यानिमित्ताने अधोरेखित होतं.