बीड : कामावरुन घरी परतणाऱ्या आचाऱ्याची निर्घृण हत्या, नेमकं कारण काय?
बीडमध्ये एका आचाऱ्याची चाकूने वार करुन हत्या करण्यात आली आहे. यावेळी आचाऱ्यासोबत असलेल्या एका मित्राने पळ काढला, तर एकजण जखमी झाला आहे. यामागे नेमकं कारण काय, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बीड : कामावरुन घरी परतणाऱ्या आचाऱ्याची निर्घृण हत्या,
नेमकं कारण काय?
Beed Crime, रोहिदास हातागळे : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे मध्यरात्रीच्या (11 जुलै) सुमारास एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. एका किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले आणि यातूनच एका 21 वर्षीय तरूणाचा चाकूने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे (वय 21, रा. पट्टीवडगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. या भीषण हल्ल्यात ज्ञानेश्वरचा एक साथीदार गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात नातेवाईक तक्रार देण्यासाठी दाखल झाले आहेत.
घरी जाताना घात झाला
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत ज्ञानेश्वर वाकडे हा गेल्या एक वर्षापासून लातूर जवळील हायवेवर एका हॉटेलमध्ये 'कूक' म्हणून काम करत होता. शनिवारी (11 जुलै) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर हा अंबाजोगाईवरून घाटनांदूरच्या दिशेने स्वतःच्या बाईकवरून जात होता. या प्रवासादरम्यान त्याच्यासोबत त्याचे इतर दोन मित्रही मोटारसायकलवर स्वार होते.
हे ही वाचा : Maharashtra Weather : जुलैमध्ये पावसाची दांडी, राज्यात असं का घडतंय? हवामान विभागाची अपडेट
चाकूने सपासप वार
ते घाटनांदूर येथील साठे चौकात पोहोचले असता, तिथे उपस्थित असलेल्या काही जणांसोबत त्यांची कोणत्यातरी कारणावरून बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, संशयित आरोपींनी आपल्याजवळील धारदार चाकू काढून ज्ञानेश्वरवर एकापाठोपाठ एक सपासप वार केले. हा हल्ला इतका भयानक आणि वर्मी लागणारा होता की, गंभीर दुखापत झाल्यामुळे ज्ञानेश्वरचा घटनास्थळीच जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा : 'पूजा करा, तुमच्या मुलाला नोकरी लागेल...' नागपुरातील भोंदू बाबाचा महिलेवर बलात्कार
एकाने काढला पळ, एकजण जखमी
या रक्तरंजित हल्ल्याच्या वेळी ज्ञानेश्वरसोबत असलेल्या दोन मित्रांपैकी एकाने प्रसंगावधान राखले. त्याने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढल्यामुळे तो या जीवघेण्या हल्ल्यातून सुदैवाने बचावला आहे. मात्र, त्यांचा दुसरा मित्र या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून मृत ज्ञानेश्वरचा मृतदेहही शवविच्छेदनासाठी याच रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.










