
भाजप-शिंदे गटाचं सरकार सत्तेत येऊन ३० जुलैला महिना पूर्ण होईल. मात्र, महिना लोटूनही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यानं राज्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण, नव्या सरकारकडून जुन्या सरकारच्या निर्णयांना देण्यात आलेली स्थगिती आणि मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व्हावी, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
सत्तेत आल्यानंतर आपल्या धोरणानुसार निर्णय घेणं, याला काही आक्षेप घेत नाही. पण ज्या प्रकारचं सुरू आहे. जिथे काम सुरू आहे. टेंडर काढली आहेत. त्या सगळ्या गोष्टी थांबवणं, हे योग्य नाही.
या निवडणुका कशा होणार आहेत, याचं चित्र स्पष्ट होऊ द्या. छगन भुजबळांनी आताच सांगितलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) सांगितलं आहे की, पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात जाईल. या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर राजकीय भूमिका घ्यावी लागेल. आमची अशी इच्छा आहे की, आमच्या सहकारी पक्षांशी याबद्दल बोलावं, पण अद्याप आम्ही चर्चा केलेली नाही. चर्चा करून एकत्रित कसा निर्णय घेता येईल, हा विचार झाला तर चांगलं होईल.
बच्चू कडू यांनी असं म्हटलं आहे की, 'या आमदारांचं (शिंदे गट) आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार टिकलं नाही, तर आम्ही इतर आमदार आमि देवेंद्र फडणवीस असे मिळून सरकार स्थापन करू, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, 'तुम्ही जे बोलत आहात, त्याची माहिती मला माहिती नाही. ज्यावेळी लोकांचा कौल घेण्याची संधी येईल, त्यावेळी हे चित्र एकदम बदलेलं. '
मंत्रिमंडळ विस्तारावर शरद पवार म्हणाले, 'मला वाटतं की, आपण राज्य चालवू शकतो असा आत्मविश्वास आहे. त्याच्यामुळे काम चालू आहे.'