लखीमपूर खीरी : व्हिडीओच समोर आलाय, आता तरी दोन अश्रू ढाळा -शिवसेना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लखीमपूर खीरी घटनेत झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूवरून शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला सुनावलं आहे. या घटनेसंदर्भातील काही व्हिडीओ आता समोर आले असून, यात शेतकऱ्यांना गाडीने उडवणाऱ्या व्हिडीओचाही समावेश आहे. या व्हिडीओकडे बोट दाखवत शिवसेनेनं मोदींवर हल्लाबोल केला.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे झालेला हिंसाचार आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना झालेली अटक या दोन्ही घटनांवरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

‘प्रियंका गांधी यांना योगी सरकारने अखेर अटक केली आहे. मागील 36 तासांपासून त्यांना सीतापूरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. ज्या घाणेरड्या जागेत प्रियंका गांधी यांना नजरकैद करून ठेवले होते, त्या जागेत प्रियंकांना स्वतः साफसफाई करावी लागत होती. हातात झाडू घेऊन कचरा काढणाऱ्या प्रियंकांचा एक व्हिडीओ जगभरात व्हायरल झाल्याने आपल्या देशाची छिःथू होत आहे. प्रियंका गांधी या काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून त्यांच्यावर राजकीय हल्ले होऊ शकतात, पण देशासाठी असीम त्याग करणाऱ्या व पाकिस्तानचे तुकडे करून भारताच्या फाळणीचा सूड घेणाऱ्या महान इंदिरा गांधींच्या त्या ‘नात’ आहेत, यांचे तरी भान प्रियंकांना बेकायदेशीरपणे कैद करणाऱ्यांनी ठेवायला हवे होते’, असं म्हणत शिवसेनेनं योगी आदित्यानाथ यांच्यावर निशाणा साधला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लखीमपूर खीरी : ‘त्या’ आठ जणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय?

‘सरकारने कोणाचेही, कसेही मुडदे पाडायचे व विरोधकांनी त्यावर आवाज उठवला तर त्यांचे गळे आवळायचे. ज्यांना मारले त्यांच्या नातेवाईकांनी अश्रू ढाळले, हुंदके दिले, तर त्या नातेवाईकांवरही उद्या सरकार उलथविण्याचे कट रचले म्हणून खटले दाखल केले जातील’, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

ADVERTISEMENT

‘लखीमपूर खेरीत केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांचे हत्याकांड घडवले. त्या मंत्रीपुत्रास वाचवण्याचे प्रयत्न योगींच्या पोलिसांनी केले. ”तो मी नव्हेच, मी तेथे नव्हतोच,” असा आव मंत्रीपुत्राने आणला. पण आता शेतकऱ्यांवर घुसवलेल्या गाडीचा व्हिडीओच समोर आला. त्यामुळे सरकार काय करणार? हे असे प्रकरण प. बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, केरळात घडले असते तर त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने देशभर आंदोलन पुकारले असते. प्रियंका गांधींना ज्याप्रमाणे अपमानित करून धक्के मारले हे भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या बाबतीत घडले असते तर महाराष्ट्रातील भाजपची महिला फौज फुगडय़ा घालत रस्त्यावर उतरली असती. महिलांवरील अत्याचाराची स्वतंत्र व्याख्या भाजपने केली असून त्या व्याख्येत इंदिरा गांधींच्या नातीवर झालेला हल्ला बसत नाही’, असं म्हणत शिवसेनेनं चित्रा वाघ यांच्यावरही निशाणा साधला.

ADVERTISEMENT

‘मोदीजी हा व्हीडिओ पाहिलात का?’,’तो’ व्हायरल VIDEO दाखवत प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल

‘सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली ‘बार्डोलीचा सत्याग्रह’ का केला, हे शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. गांधीजींनी मिठापासून परदेशी कपडय़ांपर्यंत केलेली आंदोलने शेतकऱ्यांच्याच बलिदानाने यशस्वी झाली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शेतकऱ्यांचीच पोरे शहीद झाली व आज देशाच्या सीमेवरही शेतकऱ्यांचीच पोरे मरत आहेत. त्या जवानांच्या कुटुंबांवर भरधाव गाडय़ा घालून मारण्याचे पाप सरकार करीत असेल तर ‘देश खतरे में है!’ असे मानावेच लागेल’, असं भाष्य शिवसेनेनं केलं आहे.

‘सर्व सरकारी संपत्ती खासगी लोकांना विकून टाकल्यावर आता शेतजमिनींचा लिलाव सुरू झाला आहे. त्या मनमानीविरोधात शेतकरी उभा ठाकला आहे. पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचे ऐकायला हवे. कायदे हे जनतेसाठी केले जातात. जनता कायद्यासाठी जन्माला येत नाही. कायदे मोडून, कायदेभंग करूनच गांधीजींनी स्वातंत्र्याचे आंदोलन पेटविले हे विसरू नका. प्रियंका गांधी यांची लढाई शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीच सुरू आहे. त्यांना अटक करून त्यांचा आवाज आणि शेतकऱ्यांचा आक्रोश दडपून टाकता येईल, असे सरकारला वाटत असेल तर तो भ्रम आहे. त्यांच्या या भ्रमाचा भोपळा उद्या फुटल्याशिवाय राहाणार नाही’, असा इशारा शिवसेनेनं मोदी सरकारला दिला आहे.

‘उत्तर प्रदेशात जालियनवाला बागसारखी परिस्थिती’, लखीमपूर घटनेवर शरद पवार यांची प्रतिक्रिया

‘देशाचे खासगीकरण सुरू झाले आहे. नव्या ईस्ट इंडिया कंपनीकडे देश सोपवला जाऊ नये यासाठी लढा देणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचा व्हिडीओच समोर आला आहे. आता तरी दोन अश्रू ढाळा! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांडय़ा उडाल्या. हा स्वातंत्र्याचा ‘रक्त महोत्सव’ म्हणायचा का? हे काय सुरू आहे आपल्या देशात?’, असा संतप्त सवाल शिवसेनेनं केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT