
शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर राज्यभरात आंदोलन होतं आहे. अशात आता आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय राऊत यांची अटक महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचं कट कारस्थान आहे हे सगळं जगजाहीर आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. कुडाळ या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्राचा आवाज दाबला जावा यासाठी हे सगळं सुरू आहे. संजय राऊत यांचं अटक हे कटकारस्थान आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
जे सोडून गेले त्यांच्यावर अंधविश्वास ठेवला होता. गद्दारांनी आम्हाला मिठी मारली होती.. त्यांच्या हातातला खंजीर खुपसला ते आम्हाला कळलं नाही असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली आहे. आधी सुरतला गेले त्यानंतर गुवाहाटीला गेले. गद्दारांचं सत्य सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
राज्यात जे सरकार उभं राहिलं आहे ते बेकायदेशीर सरकार आहे हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. महाराष्ट्र कधीही गद्दारी सहन करत नाही. मी मंत्री म्हणून काम करत असताना हे पाहिलं आहे. सध्या दोन लोकांचं जंबो मंत्रिमंडळ आहे. कोण मुख्यमंत्री आहे आणि कोण उपमुख्यमंत्री आहे हेच कळत नाही. तसंच जे बाहेर पडलेले बंडखोर आहेत त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जा. या सगळ्यांपैकी अनेक जण ईडीच्या दडपणामुळे गेले आहेत असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
ज्या लोकांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी आमच्या मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत. उद्धव ठाकरे यांचं मन मोठं आहे ते या लोकांना माफ करतील असंही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी या सगळ्यांना खूप जास्त दिलं. गरजेपेक्षा जास्त दिलं. या सगळ्यांना बहुदा त्याचं अपचन झालं म्हणून हे घाणेरडं राजकारण केलं जातं आहे हे सगळं तुम्हाला पटतंय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला.
तसंच ज्या माणसाने तुम्हाला सगळं काही दिलं त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही असाही प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.