‘जगेन अन् मरेन, पण…’; शंभुराजेंनी डिवचताच भास्कर जाधवांचा सुटला संयम
“मी निवडून आलो काय आणि गेलो काय? मला ना सुख, दुःख. माझ्या आईच्या घराण्यात कुणी राजकारणत नाही, ना वडिलांच्या घराण्यात. पडलो काय नि गेलो काय, तत्वाने जगेन आणि तत्वाने मरेन”, असं उत्तर जाधवांनी शंभूराज देसाईंना दिलं.
ADVERTISEMENT

Bhaskar Jadhav News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी विधानसभेत राजकीय जुगलबंदी चांगलीच रंगली. अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना शिवसेनेचे (युबीटी) आमदार भास्कर जाधव यांनी जुन्या राजकीय जखमांच्या खपल्या काढल्या आणि शिंदेंना लक्ष्य केले. गुलाबराव पाटलांना सवाल केला. यावरून शंभूराजे देसाईंनी त्यांना डिवचलं अन् भास्कर जाधवांचा संयम सुटला.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “तुमच्याबद्दल बऱ्याच जणांनी चिंता व्यक्त केली. विजयरावांना चांगलं खातं मिळालं नाही म्हणून फार मोठी चिंता तुमच्याबद्दल व्यक्त केली. त्या गोष्टीबद्दल तुम्ही फार भारावून जाऊ नका आणि दुःखीही होऊ नका. तुमची नोंद इतिहासात अशी होईल की, विजयरावांना चांगली खाती मिळाली नाही, तरीदेखील विजयरावांनी पक्ष सोडला नाही. ज्यांना सगळं काही मिळालं. ते इकडून उठले आणि तिकडे गेले. पण, विजयराव मात्र तिथेच राहिले, ही तुमच्या नावाने इतिहासात नोंद होईल.”
Bhaskar Jadhav : “तिघेही एकेकाळचे शिवसैनिक”
“तुम्ही ठरवायचं की आपली नोंद कोणती करून घ्यायचीये. या सभागृहातील तीन पदं महत्त्वाची आहे. सर्वोच्च पद म्हणून आपण (राहुल नार्वेकर) बसलेला आहात. राज्याच्या सर्वोच्च पदी एकनाथ शिंदे बसलेले आहेत. दुसरे विरोधी पक्षनेते पद हे विजय वडेट्टीवारांकडे आहे. नियतीचा काय न्याय आहे मला माहिती नाही. नियतीच्या मनात काय असतं, मला माहिती नाही. पण, तुम्ही तिघेही एकेकाळचे शिवसैनिक आहात”, ही बाब भास्कर जाधवांनी नोंदवली.
“विजयराव, तुम्हाला परिस्थिती कशीही असली, तरी लढावंच लागेल. आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. तेव्हा ही मंडळी (भाजप) तीन पायाचं सरकार, तीन चाकाचं सरकार म्हणून चेष्टा करायचे. टिंगल-टवाळी करत होते. आता तिघे एकत्र आल्यावर काय म्हणतात, त्रिशुल सरकार. देवेंद्र फडणवीस बोलण्यात अत्यंत चालाख आहे. शब्द कसा फिरवायचा, यात तुमचा हात कुणी धरू शकणार नाही”, असा टोला भास्कर जाधवांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.