सावरकर वाद: संजय राऊतांची थेट राहुल गांधी, सोनियांशी चर्चा; भाजपचं टेन्शन कायम!
राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाचे महाराष्ट्राच्या राजकारणात पडसाद उमटले. त्यानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीपासून दूर जाणार का, अशीही चर्चा सुरू झाली. मात्र, या वादावर अखेर महाविकास आघाडीत पडदा पडला आहे.
ADVERTISEMENT

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाने महाविकास आघाडीत पुन्हा पेच उभा झाल्याचं पाहायला मिळालं. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे उद्धव ठाकरे यांनी थेट राहुल गांधींवर टीका केली आणि इशाराही दिला. दुसरीकडे भाजप-शिवसेनेने हा मुद्दा उचलून धरत ठाकरेंची चांगलीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला. (savarkar-row-everything-is-okay-says-sanjay-raut-after-meet-sonia-gandhi-rahul-gandhi)
उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत राहुल गांधींनी केलेल्या विधानाबद्दलची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीच्या सभांची तयारी सुरू असतानाच या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये बिनसत की काय? असा चर्चेनं डोकं वर काढलं होतं.
शरद पवारांची मध्यस्थी, राहुल गांधींची सहमती
दरम्यान, सावरकरांवरील विधानामुळे उद्धव ठाकरेंबरोबर महाराष्ट्रात एकूणच महाविकास आघाडीचीच कोंडी झाल्याचं बघायला मिळालं. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेत मध्यस्थी केली. सावरकरांचा मुद्दा महाविकास आघाडीला अडचणी आणणारा असून, त्याबद्दल बोलणं टाळायला हवं, अशा आशयाची भूमिका पवारांनी दिल्लीतील बैठकीत मांडली. त्यावर काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिला.
संजय राऊतांची राहुल गांधी, सोनिया गांधींसोबत चर्चा
विरोधी पक्षाच्या बैठकीला शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार गैरहजर होते. सावरकर मुद्द्यांमुळे पाठ दाखवल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर या मुद्द्यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी थेट काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली.










