NCP: फडणवीसांचं ‘ते’ पत्र, अजित पवार गटाने हात केले वर..! आता नवाब मलिकांचं काय होणार?
Ajit Pawar Group: नवाब मलिक यांना आपल्या महायुतीत घेऊ नका असं स्पष्ट शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना सांगितल्यानंतर आता अजित पवार गटाने देखील या प्रकरणी आपले हात वर केले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांची मात्र पुरती कोंडी झाली आहे.
ADVERTISEMENT

Nawab Malik: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे आज (7 डिसेंबर) सत्ताधाऱ्यांसोबत गेल्यानंतर विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर अवघ्या काही तासातच देवेंद्र फडणवीसांनी एक जाहीर पत्र लिहून मलिकांना महायुतीत घेऊ नका अशी सूचना अजित पवार यांना केली होती. त्यांच्या याच पत्रानंतर आता अजित पवार गटाने देखील आता या प्रकरणात आपले हात वर केले आहेत. त्यामुळे आता नवाब मलिक हेच खिंडीत सापडल्याचं पाहायला मिळतंय. (ajit dada two steps back after devendra fadnavis letter ajit pawars group got involved in the matter of nawab malik sunil tatkare tweet gives a new twist)
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नवाब मलिक हे कोणत्या पवार गटासोबत जाणार आहेत हे आतापर्यंत स्पष्ट नव्हतं. मात्र, आज विधिमंडळ परिसरात आल्यानंतर नवाब मलिक हे सगळ्यात आधी अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्या दालनात गेले. तसेच त्यानंतर ते सत्ताधारी बाकांवर जाऊन बसल्याचा दावा विरोधकांनी केला. या सगळ्यानंतर विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं.
यामुळे फडणवीसांनी देखील खुलं पत्र लिहून नवाब मलिक हे आपल्यासोबत नकोत असं अजित पवारांना सांगितलं.
‘राष्ट्रवादी काँग्रेस मलिकांसोबत राहील’, असं म्हणाले अजित पवार गटाचे नेते..
दरम्यान, या पत्रानंतर अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी मुंबई Tak सोबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांची मागणी चुकीची असल्याचं म्हटलं. ‘नवाब मलिकांवरील आरोप अजून सिद्ध झाले नाहीत, त्यामुळे तुम्ही त्यांना आरोपी का समजता?’ असा सवालही केला होता. त्याचबरोबर नवाब मलिक यांच्या पाठीशी राष्ट्रवादी खंबीरपणे उभा राहील असंही त्यांनी म्हटलं होतं.










