Ajit Pawar : '...पाठीत खंजीर खुपसणे असा उद्देश नव्हता', अजित पवारांचं मोठं पत्र
Ajit Pawar letter : अजित पवारांनी भाजपसोबत घरोबा करण्याच्या भूमिकेबद्दल काय म्हटलं आहे?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अजित पवार यांचे महाराष्ट्रातील जनतेला खुले पत्र
शरद पवारांचे नाव न घेता अजित पवारांचा संदेश
भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेवर पहिल्यांदा खुलासा
Ajit Pawar Letter to People : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्याबाबत अनेक माध्यमांतून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. याविषयीची माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं केलेला हा पत्रप्रपंच', असे म्हणत अजित पवारांनी त्यांची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. (Ajit Pawar wrote letter for People of Maharashtra)
अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगितलं... पत्र जसंच्या तसं
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांनी आपल्या पत्रात भाजप सोबत जाण्याबद्दलच्या भूमिकेवर सविस्तर भाष्य केलं आहे... ते काय म्हणालेत वाचा...
सन 1991 पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थाने वाटचाल करीत आहे. मला राजकारणात कोणी आणले, कोणी मला मंत्रीपद दिले, कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली. खरंतर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली, त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती, त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली.
संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला, कष्ट व परिश्रम केले, इतर सर्व जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून समाजकारणासाठी स्वतःला वाहून घेतले, तीन दशकांहून अधिक काळ हा प्रवास सुरू आहे. फक्त संधी मिळून चालणार नव्हते तर त्याचा लोकांची कामे होण्यासाठी कसा उपयोग करता येईल या वरच कायम माझा भर राहिला.










