'अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद', फडणवीसांनी शाहांना रात्री 2 वाजता का केलेला फोन?
Maharashtra political story : उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये काय झालं होतं बोलणं, अमित शाहांनी सांगितलेली इनसाईड स्टोरी काय?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री वाद
उद्धव ठाकरेंनी पुन्हा घेतली शपथ
अमित शाहांनी २०२२ मध्ये काय केलेला खुलासा
Uddahv Thackeray Amit Shah : "तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो की, अमित शाह यांनी मला सांगितलं होतं की अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेऊ. 2019 साली अमित शाह यांनी शब्द दिला होता; पण तो शब्द त्यांनी पाळला नाही. ते खोटे बोलत आहेत." हे विधान उद्धव ठाकरे यांचं. याच विधानाने २०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये झालेल्या सत्तेच्या वाटाघाटीच्या चर्चेला पुन्हा तोंड फुटलं आहे.
ज्यावेळी पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांनी अडीच-वर्ष मुख्यमंत्री पदाबद्दलचा उल्लेख केला होता. त्यावर अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यात असताना सविस्तर भूमिका मांडली होती आणि हा दावाही फेटाळून लावला होता. उद्धव ठाकरे आणि अमित शाहांमध्ये काय चर्चा झाल्या होत्या. पडद्यामागे काय घडलं होतं? याबद्दल शाहांनी ६ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या भाजपच्या बैठकीत स्पष्टीकरण दिले होते.
हेही वाचा >> "नाहीतर शिवसेनेची मते भाजपला मिळणार नाही", शिंदेंनी शाहांना काय सांगितलं?
शाह यांनी सांगितलेलं की, 2014 मध्ये केवळ दोन जागांच्या हट्टापायी शिवसेनेने युती तोडली. युती तोडून आपण जास्त जागा जिंकू आणि मुख्यमंत्रीपद मिळवू असे खयाली पुलाव ते शिजवत होते; पण भाजपच्या जवळपास दुप्पट जागा आल्या. शिवसेना भाजपपेक्षा लहान पक्ष झाला. ते आम्ही नाही केले, त्यांनीच युती तोडून पायावर दगड मारून घेतला."
"उद्धव ठाकरे यांचा अहंकार त्यावेळी आडवा आला. निकालानंतर शिवसेना सुरुवातीला आमच्यासोबत आली नाही. आम्ही ठरवून टाकले की अटलजींसारखे तेरा दिवसांचे का होईना; पण सरकार आणायचेच. फडणवीस यांना मुख्यमंत्री केले. आमच्याकडे बहुमत नव्हते; पण मग शिवसेनेची मजबुरी होती, ते आमच्यासोबत आले आणि सरकार पाच वर्षे टिकले", असे शाह यांनी सांगितलेले.










