Inside Story: आधी शिवसेना नंतर NCP आणि आता वेळ 'यांची', प्रादेशिक पक्षांना 'असं' संपवलं जातंय!
Shiv Sena-NCP: ममता बॅनर्जी यांच्याकडे केवळ 20 आमदार उरले आहेत. यामुळे तृणमूल काँग्रेस पक्षावर आणि चिन्हावर कोणाचा अधिकार असणार? यावरून आता थेट कायदेशीर लढाई सुरू होणार हे स्पष्ट झाले आहे. पाहा बंगालमधील या राजकीय फुटीचा आढावा घेणारी इनसाईड स्टोरी.
ADVERTISEMENT

कोलकाता: पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटामुळे देशभरात पुन्हा एकदा पक्षांतरबंदी कायदा, विधानसभा अध्यक्षांची भूमिका आणि प्रादेशिक पक्षांच्या भवितव्यावर चर्चा सुरू झाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमधील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटीची प्रकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत.
तृणमूल काँग्रेसमधील वाद नेमका काय?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. दरम्यान, पक्षातील 80 आमदारांपैकी 58 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे पत्र देत ममता बॅनर्जी यांनी केलेली विधिमंडळ पक्षनेत्याची निवड मान्य नसल्याचे सांगितले.
हे ही वाचा>> ठाकरे-पवारांसारखा ममता दिदीसोबत मोठा गेम, कोणी घडवला एवढा मोठा भूकंप?
या आमदारांनी ऋतब्रत बॅनर्जी यांना विधिमंडळ पक्षनेते म्हणून मान्यता देण्याची मागणी केली. तसेच पक्षाच्या मुख्य प्रतोदाच्या नियुक्तीवरही आक्षेप घेतला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी अल्पावधीतच या गटाच्या दाव्याला मान्यता दिल्याचे वृत्त समोर आले. त्यामुळे तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याची चर्चा सुरू झाली.
विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्न
या संपूर्ण प्रकरणानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कारण अध्यक्षांनी इतक्या कमी वेळेत घेतलेल्या निर्णयामागे कोणता घटनात्मक आधार होता, यावर चर्चा सुरू आहे.









