शरद पवारांची साथ सोडलेल्या ‘या’ मातब्बर नेत्यांचं काय झालं?, ‘या’ दिग्गजांनी गमावलीय आमदारकी

मुंबई तक

ADVERTISEMENT

ncp sharad pawar in 2019 many mla could not retain their MLA post
ncp sharad pawar in 2019 many mla could not retain their MLA post
social share
google news

Latest News Maharashtra Politics: मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन गट पडले. प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे अशा राष्ट्रवादीतील दिग्गज आणि विश्वासू नेत्यांनी अचानक पवारांची साथ सोडली. अजित पवारांनीही साथ सोडल्यानं पवारांना घरातच मोठा धक्का बसला. पण, याआधी 2019 ला एकामागून एक अनेक नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली होती. यामध्ये पहिल्या फळीतल्या नेत्यांचाही समावेश होता. पवारांची साथ सोडलेले हे नेते सध्या काय करतात? त्यांचं काय झालं? हेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (leaders who left the ncp sharad pawar in 2019 many mla could not retain their MLA post latest news maharashtra politics)

2019 म्हणजे मोदी लाट.. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही असंच सर्वांनी गृहीत धरलं होतं किंवा सत्ताधाऱ्यांकडून तसा प्रचार सुरू करण्यात आला होता. ज्यामुळे त्यावेळी राष्ट्रवादीला बरीच गळती लागली होती आणि भाजपमध्ये इनकमिंग सुरू झालेलं. लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला भगदाड पडलं. मधुकर पिचडांसारखे स्थापनेपासूनचे बुरुज ढासळले. इतकंच काय तर राणा जगजितसिंह पाटील यासारख्या नात्यातल्या माणसांनीही साथ सोडली. पण..

पवारांची साथ सोडलेले ‘हे’ नेते सध्या काय करतात?

पवारांची साथ सोडलेल्या नेत्यांमध्ये पहिलं नाव येतं ते… मधुकर पिचड यांचं. मधुकर पिचड हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पवारांसोबत होते. ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. पवारांनी त्यांना कॅबिनेट मंत्रिपदं दिली होती. अकोले मतदारसंघातून तब्बल 1980 पासून ते निवडून आले. 1999 पासून तर 2009 पर्यंत ते सलग राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदार झाले. पण, 2014 ला याच मतदारसंघातून मुलगा वैभव पिचड यांना आमदार केलं. पण, 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पिचड पिता-पुत्रांनी पवारांची साथ सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वैभव पिचड यांना भाजपनं उमेदवारी दिली पण, त्यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवारानेच पराभव केला. इतकंच नाहीतर 28 वर्षांपासून पिचड कुटुंबाची सत्ता असलेला अगस्ती साखर कारखाना देखील त्यांच्या हातातून गेला.

पिचड कुटुंबानंतर पवारांची साथ सोडली ती. पद्मसिंह पाटील आणि राणा जगजीतसिंह पाटील या पिता-पुत्रांनी. पद्मसिंह पाटील म्हणजे तुळजापुरातलं नावाजलेलं आणि खमकं नेतृत्व. ते पवारांचे अत्यंत विश्वासू होते. त्यांना जिल्हा परिषदेपासून तर खासदारकीपर्यंत सर्व पदं मिळाली. पद्मसिंह पाटील सलग सात वेळा आमदार राहिले. त्यानंतर मुलगा राणा जगजीतसिंह पाटील यांना राष्ट्रवादीनं विधान परिषद सदस्य बनवलं. त्यांना मंत्रिपद देखील मिळालं. पण, त्यांनी 2019 च्या निवडणुकीआधी पवारांना सोडून भाजपची वाट धरली. सध्या पद्मसिंह पाटलांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील हे भाजपच्या तिकीटावर आमदार आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> ‘शरद पवार हे सैतान, ते पुन्हा येता कामा नये’, सदाभाऊ खोतांचा सुटला तोल

पवारांची साथ सोडणारं तिसरं मोठं नाव म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील. विजयसिंह मोहिते पाटील हे पवारांचे अत्यंत विश्वासू. अगदी काँग्रेसपासून 1980 ते 95 पर्यंत विजयसिंह मोहिते पाटील प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात होते. भाजप आणि सेनेचं युती सरकार आल्यानंतर पाटलांचा लाल दिवा गेला. राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर 1999 ते 2009 हा मोहिते पाटलांनी पुन्हा सुवर्णकाळ अनुभवला. बॅरिस्टर अंतुलेपासून तर अशोक चव्हाणांपर्यंत प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपद मिळालं.

ADVERTISEMENT

पण, 2009 मध्ये मतदारसंघाची पुनरर्चना झाली आणि मोहिते-पाटलांचा पराभव झाला. 2014 ला माढा लोकसभा मतदारसंघातून ते खासदार झाले. पण, 2019 मध्ये त्यांच्या घरातल्या नव्या पिढीनं म्हणजे त्यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपची वाट धरली. त्यानंतर 2020 मध्ये रणजीतसिंह मोहिते-पाटील यांना भाजपनं विधान परिषदेवर आमदार म्हणून घेतलं.

यानंतर पवारांची साथ सोडणारे नेते म्हणजे. सचिन अहीर.. ते आधीपासूनच राष्ट्रवादीत होते. सचिन अहीर हे पवारांच्या जवळचे नेते. 1999 साली ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटवर पहिल्यांदा आमदार झाले. 2009 ला त्यांना गृहनिर्माण खातं मिळालं. ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही होते. पण, 2019 ला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आणि शिवसेनेत प्रवेश केला. 2019 ला त्यांनी आदित्य ठाकरेंसाठी वरळी मतदारसंघ सोडला. त्यानंतर ठाकरेंनी त्यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून घेतलं.

यानंतर मराठवाड्यातलं मोठं नाव म्हणजे. जयदत्त क्षीरसागर.. बीड जिल्ह्यात मुंडेंचं वर्चस्व असलं तरी जयदत्त क्षीरसागर पवारांना मानणारे एकनिष्ठ नेते होते. राष्ट्रवादीनं त्यांना आघाडी सरकारच्या काळात महत्वाची खाती दिली. पण, त्यांनीही गटबाजीचं कारण देत 2019 ला पवारांची साथ सोडली आणि शिवसेनेत प्रवेश केला. सेनेनं त्यांना 2019 च्या विधानसभेत उमेदवारी दिली. दुसरीकडे राष्ट्रवादीनं जयदत्त यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांनाच मैदानात उतरवलं. काका-पुतण्याच्या लढतीत जयदत्त क्षीरसागर पराभूत झाले. आता जयदत्त क्षीरसागर यांची अवस्था कोणता झेंडा घेऊ हाती अशी झालीय. कारण सेनेच्या दोन्ही गटापासून ते दूर आहेत आणि भाजपमध्ये इच्छा असूनही स्थानिक विरोधामुळे त्यांचा प्रवेश होत नाही.

हे ही वाचा>> Maharashtra politics: महाराष्ट्राच्या राजकारणात ‘या’ पुतण्यांनी सोडली काकांची साथ

पवारांची साथ सोडलेल्यांमध्ये नाव येतं ते उदयनराजे भोसले यांचं. उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या तिकीटावर खासदार झाले. पण, 2019 साली अवघ्या सहा महिन्यात त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. शेवटी पोटनिवडणूक लागली. भाजपनं उदयनराजेंना पुन्हा मैदानात उतरवलं. पण, पवारांनी भर पावसात सभा घेतली आणि पूर्ण बाजी पलटली. उदयनराजेंचा अतिशय मोठा मताधिक्याने पराभव झाला आणि राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील निवडून आले. त्यानंतर भाजपनं उदयनराजेंना राज्यसभेवर घेतलं. सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत. पण, त्यांना अजूनही मंत्रिपद मिळालेलं नाही.

पवारांची साथ सोडल्यानंतर ‘या’ आमदारांना जनतेही नाकारलं!

2019 विधानसभा निवडणुकीआधी अनेक आमदारांनी पवारांची साथ सोडली होती. त्यापैकी बहुतेक आमदारांना जनतेनं नाकारल्याचं दिसलं. राष्ट्रवादी सोडलेल्या सात आमदारांपैकी. भास्कर जाधव आणि राणा जगजितसिंह पाटील हे दोन आमदार सोडून. दिलीप सोपल, पांडुरंग बरोरा, शेखर गोरे, जयदत्त क्षीरसागर, वैभव पिचड या पाचही आमदारांचा पराभव झाला.

सध्या अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी पवारांची सोथ सोडली आहे. त्यामुळे आता जनता या आमदारांना पुन्हा स्वीकारणार की, त्यांनाही घरचा रस्ता दाखवणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT