Adani : ‘शरद पवार पंतप्रधान असते, तर…’, राहुल गांधींनी पवारांना केले ‘सेफ’
राहुल गांधी म्हणाले, ‘शरद पवार पंतप्रधान नाहीत. शरद पवार अदाणींना वाचवत नाहीत. त्यांना मोदी वाचवत आहेत. त्यामुळे मी शरद पवारांना नाही तर पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारत आहे.’
ADVERTISEMENT

Rahul Gandhi On Sharad Pawar : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गौतम अदाणींवरून पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना घेरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी अदाणींना का वाचवत आहेत? असा प्रश्न राहुल गांधींनी नव्या प्रकरणावरून विचारला. यावेळी शरद पवार-गौतम अदाणी भेटीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असता, राहुल गांधींनी स्पष्ट भूमिका मांडली. अदाणी प्रकरणात राहुल गांधींनी संयत उत्तर देत पवारांची सुटका केली, असं म्हटलं जात आहे.
राहुल गांधींची दिल्लीत पत्रकार परिषद झाली. ‘तुम्ही सातत्याने पंतप्रधानांना (नरेंद्र मोदी) प्रश्न विचारत आहात की, अदाणींमध्ये असं काय आहे की, त्यांची चौकशी केली जात नाहीये. शरद पवारांना तुम्ही कधी असा प्रश्न विचारला का की, अदाणींमध्ये असं काय आहे की पूर्ण इंडिया आघाडी अदाणी मुद्द्यावर एकजूट आहे. शरद पवार वारंवार अदाणींना भेटतात. यावर तुमचं म्हणणं काय आहे?’, असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला.
“…तर मी शरद पवारांनाही प्रश्न विचारला असता”
“नाही. मी त्यांना हा प्रश्न नाही विचारला. शरद पवार भारताचे पंतप्रधान नाहीत. शरद पवार अदाणींना वाचवण्याचं काम करत नाहीये. मोदी वाचवत आहेत. त्यामुळे मी मोदींना हा प्रश्न विचारतोय. जर शरद पवार भारताचे पंतप्रधान आणि ते जर अदाणींना वाचवत असते, तर मी त्यांनाही हा प्रश्न विचारला असता.”
हेही वाचा >> PSI Somnath Zende : Dream 11 वर 1.5 जिंकलेल्या PSI झेंडेंना 2 चुका भोवल्या, मोठी कारवाई
राहुल गांधींनी अदाणींबद्दल कोणता मुद्दा काढला?
कोळशाच्या किमतीबाबत फायनान्शिअल टाईम्सचा अहवाल समोर आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. बुधवारी पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, “उद्योगपती गौतम अदाणी यांनी कोळशाच्या चुकीच्या किमती दाखवून आणि खोटी बिले दाखवून विजेच्या दरात वाढ केली आहे. अदाणीने थेट तुमच्या (जनतेच्या) खिशातून 12 हजार कोटी रुपये घेतले आहेत.”