
अमरावतीतलं उमेश कोल्हे हत्या प्रकरण ताजं असतानाच नुपूर शर्मा यांचा डीपी ठेवला म्हणून अहमदनगरच्या कर्जतमध्ये एका तरूणाची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. भाजप आमदार नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात यावी आणि प्रकरणाचा तपास एनआयएकडून करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
नुपूर शर्माचा डीपी ठेवला म्हणून कर्जतमधील प्रतीक पवार या तरुणाला ४ ऑगस्ट रोजी मारहाण करण्यात आली. प्रतीक पवार तरुणावर सध्या उपचार सुरु असून त्याची मृत्यूशी झुंज सुरु आहे. उदयपूर आणि अमरावतीतल हत्येच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये हत्येचा प्रयत्न करणाऱ्याला कठोर शिक्षा होईल.' भाजपाने कधीही नुपूर शर्माचं सर्मथन केलं नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
जोपर्यंत प्रतीक पवारच्या हल्लेखोरांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. या प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही लक्ष आहे. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता असाही आरोप नितेश राणेंनी केला. या प्रकरणात काही आरोपींना अटक झाली. मात्र काहीजण अजूनही फरार आहेत. आरोपींना शिक्षा मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असं नितेश राणे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
मी भाजपचा आमदार म्हणून पत्रकार परिषद घेत असलो तरीही हिंदू म्हणून माझे विचार मी मांडतो आहे असंही नितेश राणे यांनी स्पष्ट केलं. अमरावती हत्या प्रकरणाचा तपास एनआयकडे दिला गेला आहे. नुपूर शर्मा यांची जेव्हा घटना घडली तेव्हा भारतीय जनता पक्षाने या कुठल्याही विषयाचं समर्थन करत नाही हे सांगून टाकलं आणि विषयं संपवला. मात्र तरीही अमरावतीत कोल्हे यांची हत्या झाली. ४ ऑगस्टला अशाच पद्धतीचा प्रयत्न झाला.
कर्जत अहमदनगरमध्ये प्रतीक पवार नावाच्या एका तरूणाला दहा ते पंधरा मुस्लिम युवकांनी थांबवलं. तू नुपूर शर्मांचा डीपी ठेवतोय, गावातल्या लोकांनाही डीपी ठेवायला सांगतो आहे. हिंदू म्हणून जास्त आवाज करतो आहे असं म्हणत या १५ लोकांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांच्या हातात हत्यारं होती, कोयते होती. एका युवकावर हल्ला करून त्याला खाली पाडलं. तो युवक बेशुद्ध पडला. त्यांना वाटलं प्रतीक पवार मेला आहे. मात्र तो मेला नव्हता, त्याला बेशुद्ध अवस्थेत त्याला रूग्णालयात नेण्यात आलं. हा तरूण आज मृत्यूशी झुंज देतो आहे. त्याला ३५ टाके पडले आहेत.
प्रतीक पवारच्या बरगड्यांमध्ये खूप मार लागला आहे. माझा मुद्दा हाच आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा हा देश आहे. नुपूर शर्मांचा विषय बंद झाला आहे तरीही अशा पद्धतीने वारंवार हल्ले होत असतील, हिंदूंना मारून टाकण्यापर्यंत मजल जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही आमचे हात कुणी बांधलेले नाहीत असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.