
Maharashtra Kesari wrestling competition | Sikandar Shaik
पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपली असली तरी पै. सिकंदर शेखच्या कुस्तीवरुन सुरु झालेला वाद अद्याप कायम आहे. १४ जानेवारी रोजी माती विभागातील अंतिम कुस्ती सामन्यात सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली होती. मात्र या लढतीत पंचांकडून सिंकदर शेखसोबत पक्षपात झाल्याचा आरोप राज्यभरातून होत आहे. सोशल मीडियावरही यावरुन प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, याच वादाचा दुसरा अंक आता थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहचला आहे. या स्पर्धेवेळचे पंच मारुती सातव यांना आता धमकीचे फोन आले असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबतची तक्रारही पुण्याच्या कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. मारुती सातव यांच्या वतीने पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचारी संग्राम कांबळे यांनी धमकीचा फोन केला आणि तो वायरल केला असा आरोप होत आहे.
मारुती सातव यांच्या मोबाईल क्रमांकावर अज्ञाताने संपर्क साधला. सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्या लढतीत महेंद्रला चार गुण बहाल केल्याचा आरोप अज्ञा व्यक्तीने केला. तसंच सातव यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं या तक्रार अर्जात म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणात सातव यांचा जबाब नोंदवून घेण्यात येणार असून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
१४ जानेवारी रोजी माती विभागातील अंतिम कुस्ती सामन्यात सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली होती. यावेळी महेंद्र गायकवाड याने सिकंदरला बाहेरील टांग हा डाव टाकला. पण तो परफेक्ट नव्हता असं काहींचं म्हणणं आहे. त्यावरूनच वादही सुरू झाला आहे. सिकंदर धोकादायक पोजिशनला नव्हता तरी महेंद्रला चार गुण कसे दिले गेले? असा प्रश्न विचारला जात आहे. सिंकदरनेही आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे.