Nanded News : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आपली 22 गुंठे शेतजमीन विकल्यानंतरही पत्नीचा पराभव झाल्याने भोकर तालुक्यातील माधव वडगावकर हे हतबल झाले होते. आर्थिक अडचणीत असूनही त्यांनी पक्षावरील निष्ठा सोडली नाही आणि शिवसेनेचे काम सुरूच ठेवले. ही बाब समजताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी या कार्यकर्त्याच्या मदतीसाठी पुढाकार घेत त्याला त्यांची विकलेली जमीन पुन्हा मिळवून दिली. जमीन परत मिळताच माधव वडगावकर यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असून, त्यांनी शिंदे पिता-पुत्रांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : समजून घ्याः बांगलादेशी भारतात घुसतात कसे? पाहा कोणी केला भांडाफोड
निवडणुकीचा खर्च भागवण्यासाठी विकली 22 गुंठे जमीन
माधव वडगावकर हे भोकर तालुक्यातील रहिवासी असून शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अनेक वर्षांपासून त्यांनी पक्षाचे काम निष्ठेने केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नीला प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी आपली 22 गुंठे जमीन विकली होती. दुर्दैवाने पत्नीचा पराभव झाला आणि माधव वडगावकर यांच्यावर आर्थिक संकट ओढवले. शेती विकल्यानंतर ते रस्त्यावर आले होते आणि त्यांना तीव्र आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही माहिती मिळाल्यानंतरही सुरुवातीला स्थानिक स्तरावरून कोणतीही मदत मिळाली नाही, तरीही वडगावकर यांनी पक्षाची निष्ठा कायम ठेवली.
हेही वाचा : विधानपरिषद निवडणूक : महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर, कोण किती जागा लढणार?
मीन परत मिळताच माधव यांच्या अश्रूंचा बांध फुटला
काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे नांदेड दौऱ्यावर असताना त्यांना या कार्यकर्त्याच्या कठीण परिस्थितीची आणि त्याच्या निष्ठेची माहिती मिळाली. त्यांनी कोणतीही वेळ न घालवता तातडीने मदतीचा हात पुढे केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने माधव यांना त्यांची विकलेली शेतजमीन पुन्हा परत मिळाली. जमीन परत मिळताच माधव यांच्या अश्रूंचा बांध फुटला. माधव वडगावकर यांच्या डोळ्यांतील वेदना आणि पक्षासाठी केलेला त्याग पाहून आपण अस्वस्थ झालो होतो, असे सांगताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. पक्षासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या कार्यकर्त्याच्या आयुष्यात अन्याय राहू द्यायचा नाही, ही भावना मनात कायम होती, असे त्यांनी सांगितले.
शिवसेना म्हणजे केवळ राजकारण नसून आपल्या माणसांसाठी जीवापाड उभे राहणारे एक कुटुंब आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्याच्या कठीण काळात त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्यच आहे, असे ते म्हणाले. एखाद्या शिवसैनिकाच्या आयुष्यात पुन्हा आनंद येताना पाहण्यापेक्षा मोठे समाधान दुसरे असूच शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा सन्मान करणाऱ्या या संवेदनशील निर्णयामुळे नांदेडसह संपूर्ण राजकीय वर्तुळात शिंदे पिता-पुत्रांच्या संवेदनशीलतेची आणि कार्यकर्त्याच्या निष्ठेची जोरदार चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT











