विधानपरिषद निवडणूक : महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर, कोण किती जागा लढणार?
Maharashtra MLC Election : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांनी आपापल्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीने 17 पैकी 15 जागांवर एकमत केले असून, महायुतीमध्येही जागावाटपाबाबत वाटाघाटी झाल्या आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विधानपरिषद निवडणूक : महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर
कोण किती जागा लढणार? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली माहिती
Maharashtra MLC Election : विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसली असून, त्यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला आता समोर आला आहे. महाविकास आघाडी ही निवडणूक एकजुटीने लढणार असून, 17 पैकी 15 जागांवर आघाडीचे एकमत झाले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिलीये.
हेही वाचा : NCP सोडलेल्या नेत्याची 'त्या' पदावरील नेमणूक रोखा, सूनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
महाविकास आघाडीचा जागा वाटप फॉर्म्युला
काँग्रेस 8 जागा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 4 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) 3 जागा लढवणार आहेत. मात्र, नांदेड आणि नाशिक या दोन जागांवर तिन्ही पक्षांनी आपले दावे कायम ठेवल्यामुळे तिथे अद्याप तिढा कायम आहे. दरम्यान, भाजपच्या धनशक्तीचा आणि घोडेबाजाराचा आम्ही तीव्र विरोध करणार आहोत, असा आरोप सपकाळ यांनी केला आहे. सत्ताधारी युती 'पैसा फेक, तमाशा देख' अशी नीती वापरत असून, प्रत्येक मतदाराला (नगरसेवकांना) 5 लाखांची ऑफर देत असल्याचा खळबळजनक दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
हेही वाचा : गावातल्या दुसऱ्या धर्मातील मुलावर जीव जडला, निष्पाप क्रांतीसोबत भयंकर घडलं!
महायुतीचा जागावाटपाचा रणनीती फॉर्म्युला
दुसरीकडे, महायुतीमध्येही जागावाटपावरून पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप 11 जागा, शिवसेना 4 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस2 जागा लढवणार आहे. या प्रक्रियेत शिवसेनेने ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी या चार जागा निश्चित केल्या आहेत, तर राष्ट्रवादीला रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि अहिल्यानगर या जागा मिळण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेसाठी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. हा तिढा सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एक रणनीती आखली असून, रायगडचे पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या तडजोडीनंतर महायुतीतील नेत्यांच्या चर्चेला वेग आला आहे.









