नवी दिल्ली: एका केंद्रशासित प्रदेशासह पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज (4 मे) जाहीर झाले. पाचपैकी तीन राज्यात भाजपची सत्ता येत असल्याचं स्पष्ट झालं. बंगालमध्ये भाजपने जबरदस्त कामगिरी करत टीएमसीला जोरदार झटका दिला आहे. आसाममध्ये तर भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात रंगस्वामी सरकार कायम राहणार आहे. जे तिथे भाजपसोबत आहेत. तर तामिळनाडूमध्ये TVK आणि केरळमध्ये UDF चे सरकार येत असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात येत त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे. पाहा पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT
'ही... मोदीची गॅरंटी आहे!'
बंगालच्या विजयानंतर संबोधन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'या महाविजयाच्या उंबरठ्यावर असताना आम्ही टागोरांचं देखील स्मरण करत आहोत. 9 मेचा दिवस हा दूर नाही. आपला संकल्पही तोच हवा जे त्यांचं स्वप्न होतं. एक असा प्रदेश.. जिथे मन भयमुक्त असेल आणि मान ताठ असेल. भाजप बंगालमध्ये असंच भयमुक्त वातावरण तयार करून दाखवेल. ही मोदीची गॅरंटी आहे.'
मी बंगाल, आसाम, पुदुचेरी, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेला सलाम करतो - पंतप्रधान मोदी
आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी आज बंगाल, आसाम, पुदुचेरी, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेला आदराने सलाम करतो. मी त्या सर्वांना सलाम करतो. मी लाखो भाजप कार्यकर्त्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन करतो. जनता पाहत आहे की, जिथे भाजप विकास... प्रत्येक लहान-मोठ्या भाजप कार्यकर्त्याने पुन्हा एकदा चमत्कार घडवला आहे. त्यांनी कमळाला फुलवले आहे. तुम्ही इतिहास घडवला आहे. भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरच्या या पहिल्या विधानसभा निवडणुका होत्या. या निवडणुकांदरम्यान त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला दिलेले मार्गदर्शन या विजयात अमूल्य ठरले आहे."
हे ही वाचा>> West Bengal Assembly Election Result 2026: झालमुरी ते कालीघाट.. PM मोदींनी कमालच केली, दीदी हैराण.. भाजप तब्बल 'एवढ्या' जागांवर आघाडीवर
पंतप्रधान मोदी म्हणाले, "एक कार्यकर्ता म्हणून, मी प्रत्येक भाजप कार्यकर्त्याच्या आनंदात सहभागी आहे. आजचा दिवस अनेक अर्थांनी खास आहे. हा देशाच्या उज्ज्वल भविष्याची घोषणा करण्याचा दिवस आहे. हा विश्वासाचा दिवस आहे. भारताच्या महान लोकशाहीवर विश्वास, कामगिरीच्या राजकारणावर विश्वास, स्थिरतेच्या निर्धारावर विश्वास, एक भारत, महान भारताच्या भावनेवर विश्वास." असं ते म्हणाले.
हे ही वाचा>> थलपती विजयला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर... TVK कोणाची साथ घेणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगाल, आसाम आणि पुदुचेरीमधील भाजपच्या विजयानिमित्त दिल्लीतील पक्ष मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना पुढे म्हटलं की, "आजचा दिवस ऐतिहासिक आहे, अभूतपूर्व आहे. जेव्हा अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळते, तेव्हा भाजप कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो, तोच आनंद मी आज देशभरातील भाजप कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर पाहत आहे."
ADVERTISEMENT











