Ratnagiri : बापरे! दापोलीतील समुद्र किनाऱ्यावर 10 कोटींचे चरस कोठून आले?
दापोली तालुक्यात विविध ठिकाणच्या समुद्र किनाऱ्यावर सीमा शुल्क विभागाने तब्बल 10 कोटी रुपये किंमतीचा चरस साठा जप्त केला आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

-गोकूळ कांबळे, रत्नागिरी
Ratnagiri dapoli News : दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत सुमारे 257.645 किलो चरसचा साठा जप्त करण्यात आलाय. याची किंमत सुमारे 9 कोटी 88 लाख 17 हजार 600 रूपये म्हणजे जवळपास 10 कोटी रुपये इतकी आहे. चरसच्या पॉकेटला असलेल्या पॅकिंगवरून अफगाणिस्तान वा पाकिस्तानातून हा साठा आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. ही कारवाई दापोली कस्टम विभाग आणि दापोली पोलीस यांनी संयुक्तपणे केली.
14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला संवेदनशील ठिकाणी तसेच समुद्रकिनाऱ्यावर सीमा शुल्क विभागाची करडी नजर होती. या गस्तीदरम्यान दापोली सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्दे किनाऱ्यावर एक बेवारस पॉली बॅग आढळून आली. या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये 10 संशयास्पद पॉकेट आढळून आले. त्याचे वजन सुमारे 11.88 किलोग्रॅम होते.
सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा संशय खरा ठरला…
त्या पिशवीमध्ये असणारा पदार्थ ओलसर होता. समुद्रातून किनाऱ्यावर वाहून आलेला असल्यामुळे तो ओलसर झाला असावा असं दिसून आलं. पिशवीमध्ये असणाऱ्या पदार्थ हा वासावरून व पाहणी दरम्यान चरस असल्याचा संशय सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना आला.