Mumbai Rain Alert: मुंबईसह दोन जिल्ह्यात धो-धो पाऊस, दोन दिवस 'रेड अलर्ट'; शाळा-कॉलेजांना सुट्टी
Mumbai Rain Alert: IMD ने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता काही जिल्ह्यांत शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जाणून घ्या हवामान खात्याचा संपूर्ण अंदाज.
ADVERTISEMENT

Mumbai Rain Alert (प्रातिनिधिक फोटो)
मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी उद्या (4 जुलै) आणि परवा (5 जुलै) रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी अतिअतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या जिल्हानिहाय अंदाजानुसार, मुंबई महानगर क्षेत्रात मान्सून आणखी सक्रिय होणार असून पुढील 48 तास नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
'रेड अलर्ट' म्हणजे काय?
रेड अलर्ट म्हणजे अत्यंत गंभीर हवामानाचा इशारा. या काळात अतिवृष्टीमुळे पुढील परिस्थिती निर्माण होऊ शकते.
- सखल भागात पाणी साचणे
- रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम
- झाडे किंवा होर्डिंग कोसळण्याचा धोका
- दरड कोसळण्याची शक्यता
- वीजपुरवठा आणि दळणवळण सेवांमध्ये अडथळे
त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.










