Subrata Roy : 2 हजारातून उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य, चिटफंडमधून कसा उभा केला ‘सहारा समूह’?
subrata roy life story in Marathi : सुब्रतो रॉय यांनी २००० रुपयापासून व्यवसायाची सुरुवात केली आणि काही काळातच ते देशातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पोहोचले. सुब्रतो रॉय यांचा जीवन प्रवास कसा होता? वाचा…
ADVERTISEMENT

Story of Subrata Roy Sahara : सहारा ग्रुपचे (Sahara India Pariwar) प्रमुख सुब्रत रॉय (Subrata Roy) यांचे मंगळवारी (14 नोव्हेंबर) रात्री उशिरा निधन झाले. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. रॉय यांच्या निधनानंतर त्यांच्या संघर्षांच्या कहाणीची आणि त्यांनी २ हजारातून उभ्या केलेल्या सहारा समूहाची पुन्हा एकदा चर्चा होतेय. सुब्रतो रॉय नेमके कोण होते आणि त्यांनी सहारा इंडिया कशी उभी केली, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. (Story of Subrata Roy Sahara)
1948 मध्ये बिहारच्या अररिया जिल्ह्यात जन्मलेल्या सहारा समूहाचे संस्थापक सुब्रतो रॉय यांचे उत्तर प्रदेशातील गोरखपूरशी घट्ट नाते आहे. त्यांनी शिक्षण आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी येथूनच सुरू केल्या. त्यानंतर अवघ्या 2000 रुपयांपासून सुरू झालेल्या फायनान्स कंपनीचा व्यवसाय त्यांनी काही काळातच 2 लाख कोटींवर नेला. एक काळ असा होता जेव्हा सुब्रतो रॉय गोरखपूरच्या बेट्टीहाटा येथे एका वकिलाच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होते. इथेच त्यांच्या मुलांचा जन्म झाला.
‘सहारा श्री’ सुब्रतो रॉय यांनी वित्त, रिअल इस्टेट, मीडिया आणि हॉस्पिटॅलिटी, इतर क्षेत्रांसह एक विशाल साम्राज्य उभं केलं. 1978 मध्ये त्यांनी ‘सहारा इंडिया परिवार’ ग्रुपची स्थापना केली. रॉय यांना गोरखपूरबद्दल खूप आपुलकी होती. त्यामुळे त्यांनी मीडिया क्षेत्र असो किंवा रिअल इस्टेट, त्यांच्या कंपनीने गोरखपूरमध्ये मोठी गुंतवणूक केली. 2000 मध्ये रॉय यांच्या निमंत्रणावरून अमिताभ बच्चनसारखे दिग्गज सिनेकलाकार गोरखपूरला गेले होते.
भाड्याची खोली आणि स्कूटरवरून वाढवला व्यवसाय
सुब्रतो रॉय यांनी 1978 मध्ये त्यांचे मित्र एसके नाथ यांच्यासोबत गोरखपूरमध्ये फायनान्स कंपनी सुरू केली. जिचं ऑफिस सिनेमा रोडवर होतं. सुरुवातीला हे भाड्याने घेतलेले कार्यालय एका खोलीचे होते, त्यात दोन खुर्च्या होत्या. जिथे रॉय त्याच्या स्कूटरवर यायचे.