
संजय राऊतांच्या घरी ईडीची चौकशी आणि झाडाझडती सुरू असतानाच शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे, शरद आणि संजय राऊतांवर निशाणा साधला. मी अभ्यास करून बोलतोय आणि माझा दावा आहे की, संजय राऊत हे शरद पवारांचेच आहेत, ते शिवसैनिक नाहीत,' असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
रामदास कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. गद्दार शब्दावरून कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. "महाराष्ट्रात जे काही चाललंय. सगळं गढूळ झालंय. त्याच्यामागे कोण आहे. उद्धवजींच्या आसपासचे बडवे कोण आहेत. कधीतरी याचा विचार होणार आहे की, नाही. ५२ वर्ष काम केलेल्या रामदास कदमला आज बाजूला व्हावं लागतंय. मग रामदास कदम गद्दार आहे की, तुमच्या आजूबाजूचे लोक गद्दार आहेत? गद्दाराची नेमकी व्याख्या काय आहे?," असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला.
"६४ पैकी ५१ आमदार जातात. शिल्लक राहिलेले प्रामाणिक आणि बाकीचे गद्दार. गद्दारची व्याख्या काय आहे. का घडलं हे. याच्या मुळापर्यंत जाणार की नाही. अभ्यास करणार की नाही. पक्ष वाचवणार की नाही. बाळासाहेबांचे विचार वाचवणार आहेत की, नाही. आपल्याला शरद पवारांचे विचार घेऊन पुढे जायचं का? माझा दावा आहे की, संजय राऊत हे शरद पवारांचेच आहेत. ते शिवसैनिक नाहीत. मी हे प्रचंड अभ्यासाने बोलतोय," असं रामदास कदम म्हणाले.
"शिवसेनेवरती अन्याय होत होता. आमदारांवरती अन्याय होत होता. माझ्या मुलावरती अन्याय होत होता. खेडचा मनसेचा नगराध्यक्ष, तो काम करतो राष्ट्रवादीचं. त्याची आम्ही अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली. त्याचं निलंबन करण्यासाठी ती प्रकरणं जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला १० प्रकरणात दोषी ठरवलं. ती प्रकरणं शासनाकडे पाठवली. शासनाने १५ दिवसांत निकाल दिला पाहिजे असा निर्णय आहे. दोन महिने झाले तरी कार्यवाही झाली नाही."
"मी एकनाथ शिंदेंना भेटलो. सरकार आपलं आहे. तुम्ही मंत्री आहात, असं मी त्यांना म्हणालो. एकनाथ शिंदे म्हणाले, 'माझे हात बांधले गेले आहेत. मनसेच्या नगराध्यक्षाचं निलंबन करायचं नाही, असं मला उद्धवजींनी सांगितलं.' मी त्यांना सांगितलं की, शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी प्रस्ताव पाठवला आहे. तो आपल्या पक्षाच्या मुळावर उठला आहे. त्याला वाचवता आहात. ते म्हणाले, शरद पवारांना शब्द दिला. जे शरद पवार आमच्या पक्षाच्या मुळावर उठलेत, त्यांचं तुम्ही ऐकत आहात. राज्य चालवत आहात, याचं दुःख मनामध्ये आहेत," अशी टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
"माझ्या मुलाला, योगेश कदमला राजकारणातून उठवण्याचा पूर्ण प्रयत्न झाला. दापोली मतदारसंघातील जनतेचे मी आभार मानतो. त्यांना दया आली. तिथली जनता त्याच्या पाठिशी उभी राहिली. दापोलीची शिवसेनेच्या ताब्यात असलेली नगर परिषद राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचं काम अनिल परबने केलं. कोण शिवसेना संपवतोय. कोण गद्दार आहे. याची उत्तरं कोण देणार आहेत. गद्दार म्हणायला सोप्पं, पण अभ्यास केला का? माहिती घेतली का?," असा सवाल कदम यांनी केला.
"माझी संजय राऊतांना विनंती आहे की, खुलेपणानं सामोरे जा. पण भविष्यात शिवसेना सोडून अन्य कुणाची भांडी घासू नका. शिवसेनेला संपवण्याचं काम आपल्या हातून होता कामा नये, अशी माझी संजय राऊतांना विनंती आहे," असं रामदास कदम म्हणाले.