
मिरज : शहरात रातोरात केलेली पाडापाडीची कृती चुकीचीच होती. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या कोणालाही भाजप पाठीशी घालत नाही. पक्षश्रेष्ठी याबाबत योग्य तो निर्णय घेतील, अशा शब्दात भाजप नेते आणि सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी भाजप नेते, जिल्हा परिषद सदस्य ब्रम्हानंद पडळकर यांना फटकारलं आहे. ते सांगलीत बोलतं होते. ब्रम्हानंद पडळकर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू
सुरेश खाडे म्हणाले, पडळकर यांनी मिरजेत केलेली कृती योग्य नाही. ती दुर्दैवी स्वरूपाची आहे. सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना भाजप कधीही पाठीशी घालत नाही आणि घालणार नाही. पक्षश्रेष्ठी याबाबत योग्य तो निर्णय घेतील. तसंच या पाडापाडी बाबत पोलीसही योग्य कारवाई करतील, असं आश्वासन देखील पालकमंत्री खाडे यांनी यावेळी दिले. शिवाय जागेचा ताबा हा कायदेशीर मार्गानेही घेता आला असता, मात्र दुर्देवी स्वरुपाची कृती झाली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या साह्याने पाडले आणि ब्रह्मानंद पडळकर यांनी बेकायदेशीरपणे जागेचा ताबा घेण्याच्या प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह १०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर रस्त्याला लागून असलेले दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोअर्स, ट्रॅव्हल ऑफिस, एक घर, पान शॉप अशा दहा मिळकती शनिवारी मध्यरात्री पाडण्यात आल्या. यासाठी मध्यरात्री पोकलेनच्या सहाय्याने शेकडो लोकांचा जमाव घेऊन ब्रम्हानंद पडळकर हे आले होते, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांनी ब्रम्हानंद पडळकर यांच्या कृतीचं समर्थन केलं होतं. ते म्हणाले, हा विषय नीटपणे समजून घ्यायला हवा. मिरजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज रोडवर नॅशनल हायवेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. यासोबतच एक महिन्यापासून त्या रस्त्यावरील अतिक्रमाला काढायचं काम महानगरपालिकेच्या वतीने चालू आहे. महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त आणि अतिक्रमण विभागाचे प्रमु मागील महिन्याभरापासून त्या रस्त्यावरची सर्व अतिक्रमण काढत आहेत.
माझे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्या नावावर मिरज स्टॅन्डच्या समोरचा ५१ गुंठ्याचा प्लॉट आहे, त्या प्लॉटमध्येसुद्धा अतिक्रमण आहे. या अतिक्रमाणाच्या बाबत सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने वारंवार या लोकांना सूचना दिल्या होत्या की तुम्ही अतिक्रमण काढून. दोन ते तीन वेळा त्यांचे अधिकारी येऊन गेले त्यांची वादावादी झाली. त्यानंतर मागील महिन्यातील 16 तारखेला ब्रह्मानंद पडळकर यांना एक नोटीस काढलं आणि त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलं की 24 तासाच्या अतिक्रमण काढून घ्या.
परंतु आणि त्या आस्थापना आणि त्यांच्या मालकांना निरोप दिला की महानगरपालिकेचे नोटीस आले तर तुमच्या पद्धतीने काढून घ्या. नंतर महानगरपालिकेला परवाच्या दिवशी दुसऱ्यांना रिमाइंड नोटीस काढलं आणि तुम्ही ते अतिक्रमण कसल्याही परिस्थितीमध्ये काढून घ्या. त्यानुसार ते अतिक्रमन काढलेलं आहे. त्यामध्ये कुठलंही, कसलंही चुकीचं काम केलेलं नाही, असं मतही पडळकर यांनी व्यक्त केलं.