शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार का नाराज?, ‘हे’ आहे कारण!
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून सध्या खूपच नाराज असल्याचं समजतं आहे. त्यांना हव्या असलेल्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळत नसल्याने आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
ADVERTISEMENT

माधवी देसाई, मुंबई: शिंदे-फडणवीसांच्या डबल इंजिन सरकारमध्ये अजित पवारांच्या (Ajit Pawar) रुपानं तिसरं इंजिन जोडलं गेलं. मात्र, जेव्हापासून अजितदादांची सरकारमध्ये एंट्री झाली तेव्हापासून तिन्ही पक्षात मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप ते पालकमंत्रिपद (guardian minister) असा सगळ्याच पातळ्यांवर गोंधळ आणि गुंतागुंत कमालीची वाढली आहे. आता 15 ऑगस्टनिमित्त झेंडावंदनासाठी मंत्र्यांना जिल्ह्यांचं वाटप करण्यात आलं आहे. मात्र, या यादीवरुनही नाराजीनाट्य सुरु झालं. खातेवाटप होऊन जवळपास महिना उलटला. तरीही, पालकमंत्रिपदाचा प्रश्न कायम का? राष्ट्रवादीचे मंत्री झेंडावंदनाच्या यादीवरुन नाराज का झाले? पालकमंत्रिपदाचं घोडं अडलंय कुठे? याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.(deputy chief minister ajit pawar is currently very upset over the issue of guardian minister post bjp shiv sena ncp)
राज्याचं पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर 14 जुलैला राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आलं. आता खातेवाटपाला साधारण महिना पूर्ण होईल. मात्र, या मंत्र्यांच्या पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झालेली नाही. आता 15 ऑगस्टनिमित्त कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजवंदन करतील याची यादी आली आहे. यात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणते जिल्हे मिळाले ते पाहूयात.
- अजित पवार- कोल्हापूर
- दिलीप वळसे-पाटील-वाशिम
- छगन भुजबळ- अमरावती
- धनंजय मुंडे- बीड
- हसन मुश्रीफ- सोलापूर
- धर्मराव अत्राम- गडचिरोली
- संजय बनसोडे- लातूर
- अदिती तटकरे- पालघर
- अनिल पापील- बुलढाणा
या 9 जणांपैकी धनंजय मुंडे, संजय बनसोडे आणि धर्मरावबाबा अत्राम हे 3 मंत्री त्यांच्याच जिल्ह्यांत ध्वजवंदन करतील. मात्र, इतर 6 जणांना वेगळ्याच जिल्ह्यांत ध्वजवंदनाची जबाबदारी देण्यात आली आहे.तसेच ज्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन वाद सुरु आहे तिथे जिल्ह्याधिकारीच ध्वजारोहण करणार आहेत. याशिवाय हिंगोली, गोंदिया, भंडारा, नांदेड, अकोला अशा 7 जिल्ह्यांत जिल्ह्याधिकारीच ध्वजारोहण करतील. देवेंद्र फडणवीसांकडे 6 जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद आहे. मात्र ते नागपूरला ध्वजवंदन करतील.
हे ही वाचा >> Nawab Malik: ‘..म्हणून मलिकांना जामीन’, पृथ्वीराज चव्हाणांना ‘तो’ संशय; गंभीर आरोप
आता याच यादीवरुन नाराजीनाट्य सुरु झालं आहे. अजितदादांसह त्यांच्यासोबतच्या काही मंत्र्यांनी या यादीवरुन नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यामुळे, दादांच्या हट्टापायी ही यादी बदलण्याची वेळ आली आहे. यावरुन हे स्पष्ट होतंय की शिंदे सरकार अजूनही पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवण्यात अपयशी ठरलं आहे. मात्र, हा तिढा काय आहे? अजूनही मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रिपदाचं वाटप का होत नाही? यामागची काही प्रमुख कारणं पाहूयात.