‘बीआरएसचा फटका ‘मविआ’लाच बसणार’, सुनील तटकरेंनी मतदारसंघातीलच दिलं उदाहरण
केसीआर यांनी सुरूवातीला महाराष्ट्राच्या सीमाभागात दौरे केल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांच्या पक्षाची वाट धरलीये आणि त्यामुळेच बीआरएसचा फटका महाविकास आघाडीला आगामी निवडणुकीत बसू शकतो, असं म्हटलं जात आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra Political Situation Now : के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने विधानसभा निवडणुकीची जोरात तयारी सुरू केली आहे. केसीआर यांनी सुरूवातीला महाराष्ट्राच्या सीमाभागात दौरे केल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांच्या पक्षाची वाट धरलीये आणि त्यामुळेच बीआरएसचा फटका महाविकास आघाडीला आगामी निवडणुकीत बसू शकतो, असं म्हटलं जात आहे. याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनीच दुजोरा दिला आहे.
बारामती येथे बोलताना सुनील तटकरे म्हणाले, “बीआरएस किंवा वंचित बहुजन आघाडी यांच्याकडे येणारी मते ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधातील मतदारांचा कौल असतो. या मतात फूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय जनता पार्टीला पडणारी मते ठरलेली असतात. धर्मनिरपेक्ष विचारांची मते ही ठरलेली असतात. त्यामुळे बीआरएस आणि वंचित बहुजन आघाडी या शक्तींचा महाराष्ट्रात होत असलेला प्रवेश त्रासदायक आहे.”
हेही वाचा >> BRS : तेलंगणात एकहाती सत्ता, आता महाराष्ट्रावर नजर; कोण आहेत केसीआर?
पुढे बोलताना तटकरे यांनी 2019 मधील राजकीय स्थितीचाही दाखला दिला. ते म्हणाले, “2019 च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार मोठ्या प्रमाणात पराभूत झालेत. विधानसभेत त्याचा परिणाम झाला नाही, पण नवीन शक्तींमुळे नवीन ध्रुवीकरण ज्यावेळी होईल, त्याचा परिणाम धर्मनिरपेक्ष मतांच्या ध्रुवीकरणांमध्ये होऊ शकतो. मात्र महाविकास आघाडी आणि घटक पक्ष याबाबत विचार करतील.”
मतांमध्ये विभाजन म्हणजे भाजपला मदत
सुनील तटकरे असंही म्हणाले की, “2019 च्या मतदानाची आकडेवारी जर काढली तर माझ्या मतदारसंघात बहुजन वंचित आघाडीला लक्षणीय मतं मिळाली होती. ते उमेदवार उभे राहिले नसते, तर माझं मताधिक्य लाखापेक्षा जास्त मतांनी वाढल असतं. आज धर्मनिरपेक्ष विचारांच्या मतांमध्ये विभाजन होणे म्हणजे भाजपाला मदत करणं हे सरळ सूत्र आहे”, असं विश्लेषण तटकरे यांनी बीआरएसच्या बाबतीत बोलताना केलं.










