Karnataka: ‘फोडाफोडी, खोक्यांचं राजकारण हे..’, शिंदेंचं नाव घेत पवारांनी भाजपला डिवचलं!
Karnataka Elections Result: कर्नाटक निवडणूक निकाल हा काँग्रेसच्या बाजूने लागला असून शरद पवार यांनी या निकालाबाबत समाधान व्यक्त केलं आहे. पण त्याचसोबत त्यांनी भाजपवर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Vidhansabha Elections) भाजपला (BJP) आपली सत्ता गमवावी लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी कर्नाटकातील जनतेने काँग्रेसला (Congress) एकहाती सत्ता दिली आहे. याचबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना भाजपच्या एकूण राजकारणावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. कर्नाटकच्या जनतेने फोडाफोडी आणि खोक्याच्या राजकारणाला योग्य उत्तर दिलं असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. (nationalist congress president sharad pawar strongly criticized the bjp after the karnataka elections)
‘फोडाफोडी, खोक्याचं राजकारण लोकांना पसंत नाही’
‘कर्नाटकात पहिले जे सरकार होतं ते सरकार लोक फोडून तिथे घालवलं गेलं. जे महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी केलं तेच त्यांनी तिथे केलं होतं. तेच मध्यप्रदेशमध्ये कमलनाथांच्या नेतृत्वात सरकार होतं तिथेही आमदार फोडलं आणि ते राज्य हातात घेतलं. गोव्यात सुद्धा भाजपचं बहुमत नव्हतं पण तिथेही आमदार फोडलं आणि राज्य हातात घेतलं. ही एक नवीन पद्धत साधन, संपत्तीचा वापर करून अलीकडे देशात केला जात आहे. ही चिंताजनक गोष्ट आहे.’
‘पण दुसरी त्याला बाजू अशी आहे की, फोडाफोडी, खोक्यांचं राजकारण हे लोकांना पसंत नाही. याचं उत्तम उदाहरण हे या कर्नाटकाच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे.’ अशा बोचऱ्या शब्दात शरद पवार यांनी भाजपचा समाचार घेतला.
कर्नाटकाच्या निवडणूक निकालाबाबत काय म्हणाले शरद पवार?
‘राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कर्नाटकात शक्तीशाली पक्ष आहे अशी काही स्थिती नाही. पण आम्ही एक प्रयत्न केला. 7 उमेदवार उभे करून. खरं सांगायचं म्हणजे त्यामध्ये एका उमेदवाराला आम्ही शक्ती दिली होती. तिथे काही निर्णय मिळतील अशी अपेक्षा केली होती. तो मतदारसंघ म्हणजे निपाणीचा मतदारसंघ. आतापर्यंतची जी आकडेवारी दिसतेय पहिल्या पाच फेऱ्यांपर्यंत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, आता तो दुसऱ्या स्थानी गेला आहे. सध्या मतांचं अंतर हे 6000 आहे. त्यामुळे आता तिथे यश नक्की मिळेल अशी खात्री देता येत नाही. पण एखाद्या राज्यात एंट्री करायची असेल तर ती एंट्री करण्याच्या दृष्टीने आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.’