
राज्यात येत्या दहा तारखेला राज्यसभेची निवडणूक (Rajyasabha Election) होत आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडी आणि भाजपकडून मतांची जुळवाजुळव सुरु असून, एमआयएमची दोन मते कुणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजार रोखण्याठी आघाडीच्या सर्वच आमदारांना मुंबईमध्ये बोलवण्यात आलं आहे. यंदाच्या राज्यसभा निवडणुकीसाठी एक-एक मत महत्त्वाचं बनलं आहे.
आता एमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी 'भाजपला पराभूत करायचे असेल, तर महाविकास आघाडीने मदत मागावी,' असं म्हटलं आहे. त्यामुळे आता एमआयएमकडे प्रस्ताव कोण पाठणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
मुद्द्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे. एमआयएम पक्षाची ज्यांच्यासोबत युती आहे ते त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवतील, असे नाना पटोले म्हणाले आहेत.
एमआयएमचे महाराष्ट्रात दोन आमदार आहेत. “ज्या पक्षांची त्यांच्यासोबत युती आहे, तेच लोक त्यांना बैठकीसाठी आमंत्रण देतील. आमच्यासोबत समाजवादी पक्ष आहे. त्यामुळे आमच्याकडून समाजवादी पक्षाला विनंती केली जाणार आहे. एमआयएम राष्ट्रवादीकडे आहे,” असे मत नाना पटोले व्यक्त केले आहे.
प्रत्येक छोट्या मोठ्या पक्षाला महाविकास आघाडीला मतदान करा, असे आवाहन करणार असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितलं.
काँग्रेस आमदारांबद्दल विचारले असता नाना पटोले म्हणाले, "काँग्रेस आमदारांना प्रशिक्षण देण्याची गरज नाही. फक्त मतदानाची पद्धत काय असणार आहे, हे सांगितले जाईल. आम्हाला काँग्रेसच्या विचारधारेची चळवळ उभी करायची आहे. त्यावरही आम्हाला चर्चा करायची आहे."
"आम्ही सर्व आमदारांना एकत्र ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणूनच काँग्रेसचे सगळे आमदार दोन दिवस मुंबईमध्ये असणार आहेत. सध्यातरी लोहगड या माझ्या निवासस्थानावर आम्ही सर्वजण राहू," असा निर्णय घेतल्याचे नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.
दरम्यान, असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीकडून आम्हाला अजून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आम्ही अजून वाट पाहू. जर आघाडीकडून प्रस्ताव आलाच नाही, तर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. आम्ही आमच्या आमदारांच्या संपर्कात आहोत," असे ओवेसी म्हणाले.