Maharashtra politics : अजित पवारांची NDA त एन्ट्री एकनाथ शिंदेंसाठी ‘बॅड न्यूज’!
महाराष्ट्राच्या या राजकीय घडामोडीने अनेक राजकीय संदेश दिले आहेत. अजित पवार महाराष्ट्रातील सरकारमध्ये सामील झाले म्हणजे एकनाथ शिंदे यांची भाजपसोबत बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे. कारण भाजपकडे आता चांगला पर्याय म्हणून अजित पवार आहेत.
ADVERTISEMENT

Maharashtra Political News in Marathi : रविवारची दुपार महाराष्ट्रासाठी राजकीय वादळ घेऊन आली. अवघ्या काही तासांतच राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी 180 अंशांचा टर्न घेत काका शरद पवार यांच्या विरोधात बंडखोरी केली. हे काही किरकोळ बंड नाही. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील या संघर्षाने 2 जुलैला महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलून टाकले. अजित पवारांनी आधी आमदारांची बैठक घेतली आणि नंतर थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ! अजित पवार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत. पण, अजित पवारांचा एनडीएतील प्रवेश हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी चांगली बातमी आहे आहे, असं म्हणता येणार नाही. (How Ajit Pawar’s entry in NDA can prove to be bad news for Eknath Shinde)
रविवारी दुपारी अजित पवार थेट राजभवनवर पोहोचले. अजित पवार यांच्यासोबत 18 आमदार होते. आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होणार, अशी बातमी आली. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासांच्या कालावधीत महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र पूर्णपणे बदलले.
वाचा >> Maharashtra politics : अजित पवारांनी घेतली शपथ, शरद पवारांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण, अजित पवारांचा एनडीएतील प्रवेश हा शिंदे गटासाठी अडचणीचा ठरू शकतो. तो कसा तेच पाहुयात…
भाजपसमोर शिंदेंची बार्गेनिंग पॉवर झाली कमी
महाराष्ट्राच्या या राजकीय घडामोडीने अनेक राजकीय संदेश दिले आहेत. अजित पवार महाराष्ट्रातील सरकारमध्ये सामील झाले म्हणजे एकनाथ शिंदे यांची भाजपसोबत बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे. कारण भाजपकडे आता चांगला पर्याय म्हणून अजित पवार आहेत. आपल्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार भाजप एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यासोबत पुढे जाऊ शकते, किंवा दोघांनाही सोबत घेऊ शकते, हे आगामी राजकीय परिस्थितीवर अवलंबून असेल. तसेच या त्रिकोणी मैत्रीची खरी अग्निपरीक्षा 2024 मध्ये जागा वाटपा दरम्यान होणार आहे.