छ. संभाजीनगर: ‘त्या’ भागात 99 टक्के मुस्लिम समाज, हल्ला करणारे त्यांचेच लोक; कराडांचा मोठा आरोप
राम नवमी उत्सवाची तयारी सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंसक घटना घडली. आता या हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
ADVERTISEMENT

Chhatrapati Sambhajinagar Violence
छत्रपती संभाजीनगर : राम नवमी उत्सवाची तयारी सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) हिंसक घटना घडली. दोन समुदायातील तरुणाच्या गटात वाद होऊन परिस्थिती चिघळली. यावेळी दगडफेक आणि जाळपोळ असे प्रकार घडले. त्यामुळे रात्रभर शहरात तणाव निर्माण झाला होता. मात्र आता या हिंसक घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमधील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. पोलीस प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. (Chhatrapati Sambhajinagar Violence Incident Minister Bhagwat Karad and MP Imtiaz Jaleel)
दरम्यान, आता या हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. ‘मुंबई तक’शी बोलताना हा हल्ला पूर्वनियोजीत आणि एमआयएम किंवा खासदार इम्तियाज जलील समर्थकांचा असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला. तर खासदार जलील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत मी दीड वाजता स्कुटर घेऊन रस्त्यावर होतो आणि त्यावेळी डॉ. कराड घरात झोपले होते, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला.
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगरात दगडफेक, जाळपोळ; पोलिसांकडून हवेत गोळीबार
काय म्हणाले डॉ. भागवत कराड?
हल्ला पूर्ण नियोजीत आणि राजकीय रंग असण्याची शक्यता :
एकंदरीत हा हल्ला जर पाहिलं तर बरीचशी लोक आहेत काही लोकांनी डोक्याला आणि तोंडाला बांधून घेतलं आहे. सोबतच रात्री बारा एकच्या आसपास इतक्या लवकर इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमली त्यावरुन तो नियोजित आहे का काय असं वाटतो. या गोष्टीला राजकीय रंग असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मागच्या एक महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमआयएमच्या माध्यमातून साखळी उपोषण चालू होतं. त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे काही नेते, माजी खासदार ज्या पद्धतीने भाषणे करतात ते अत्यंत चुकीचे आहे. या शहरांमध्ये शांतता राबली पाहिजे शांततेसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पण काही लोक मुद्दाम राजकारण करतात. माजी खासदार मधूनच काहीतरी बडबड करतात.