Ajit Pawar: ‘आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत…’, अजितदादांकडून ‘त्या’ कृतीचं समर्थन
Breaking News Maharashtra Marathi: आम्ही याआधी शिवसेनेसोबत सत्तेत होतो. तर आता भाजपसोबत जाण्यामध्ये आम्हाला काहीही हरकत नाही असा दावा अजित पवार यांनी केला आहे. पाहा ते पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

Breaking News Maharashtra Marathi: मुंबई: नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (2 जुलै) राज्याच्या राजकारणात जबरदस्त भूकंप घडवून आणला. यावेळी त्यांनी स्वत: उपमुख्यमंत्री पदाची शपथ तर घेतलीच पण त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) 9 दिग्गज नेत्यांना देखील मंत्री पदाची शपथ दिली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार आपल्यासोबत आहेत असा दावा अजित पवार यांनी केला. या सगळ्या घडामोडीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी असं वक्तव्य केलं की, ‘आम्ही जर शिवसेनेसोबत (Shiv Sena) जाऊ शकतो तर आम्ही भाजपसोबत (BJP) जाऊच शकतो..’ यामुळे या सरकारमध्ये जाण्यास आपल्याला काहीही अडचण नाही. असंच अजित पवार यावेळी म्हणाले.
पाहा पत्रकार परिषदेत अजित पवार नेमकं काय म्हणाले:
‘भाजपसोबत जाण्याबाबत अनेक दिवस चर्चा सुरू होती’
‘आज जो निर्णय घेतला आहे त्यासंदर्भात अनेक दिवस चर्चा सुरू होती. चर्चा चालू असताना वरिष्ठ पातळीवरचे सगळे जणं एकत्र बसायचो. देश पातळीवरची जी काही राजकीय परिस्थिती आहे. राज्याची जी काही परिस्थिती आहे या सगळ्याचा विचार करता आपण विकासाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे असं माझं आणि सर्व सहकाऱ्यांचं म्हणणं पडलं. त्यामधून देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो काही कारभार सुरू आहे. त्या कारभाराच्या निमित्ताने पाहिलं तर देशाला मजबुतीने पुढे नेण्याचा प्रयत्न हे मोदी साहेब करत आहेत. असा प्रयत्न करत असताना आपण त्या बाबीला पाठिंबा दिला पाहिजे.’
‘सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या बैठका होत आहेत. पण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी परिस्थिती आहे. यामुळे विरोधी पक्षाच्या बैठका होतात त्यातून साध्य काहीच होत नाही.’
‘मी शुक्रवारीच विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला’
‘आज शिंदे-फडणवीस सरकार यांचं इथे होतं. इतके दिवस मी तिथे विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो. पण शुक्रवारी मी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला. मागे देखील वर्धापनदिनानिमित्त मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती.’