‘हा भाजपचा पिढीजात धंदा’; शिवसेनेनं (UBT) डिवचलं, फडणवीसांवर टीकेचे बाण
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, अकोला या जिल्ह्यांमध्ये दंगली आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या. या घटनांवरून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भाजपवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT

“ज्यांची सत्ता दंगलीच्या ज्वालेतून निर्माण झाली त्यांना दंगलीचे व धार्मिक तणावांचे प्रेम असणारच”, असं म्हणत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यात घडलेल्या दंगली आणि हिंसाचाराच्या घटनेवरून थेट भाजपवरच ठपका ठेवला आहे. भाजपत ‘दंगल-तणाव-भडकाव महामंडळ’ असल्याचं सांगत ठाकरे गटाने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं आहे.
शिवसेनेने सामना अग्रलेखातून राज्यात झालेल्या हिंसाचार आणि दंगलीच्या घटनांवर भाष्य केलं आहे. राज्यातील सत्तांतरांनंतर या घटना वाढल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.
अग्रलेखात म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून जातीय आणि धार्मिक दंगलींचे प्रमाण वाढले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे वाऱ्यावर आहेत आणि गृहमंत्री फडणवीस नावालाच आहेत असेच एकंदरीत दिसते. दंगली पेटवून राजकीय भाकऱ्या शेकायच्या हा भाजपचा पिढीजात धंदा आहे व निवडणुका जवळ आल्या की या धंद्यातील गुंतवणुकीत वाढ केली जाते. असे गुंतवणूकदार आता आपल्या राज्यात घुसले आहेत. म्हणूनच आम्हाला महाराष्ट्राच्या भवितव्याची चिंता वाटते.”
‘महाराष्ट्र धुमसत राहण्यासाठी नियोजन…’
“विदर्भातील अकोला येथे शनिवारी दोन गटांत दंगलीचा भडका उडाला. किरकोळ वादातून हाणामारी व त्यातून दंगलीची आग भडकली. ही दंगल हाताळण्यात पोलीस कमी पडले. सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाली आणि त्यातून वादाला सुरुवात झाली. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला. अकोला येथे सध्या 144 कलम लागू करण्यात आले आहे. तथापि संपूर्ण शहरात या हिंसाचारामुळे भीतीचे सावट आहे. इन्स्टाग्रामवरील एका पोस्टवरून अकोल्यात एक दंगल उसळली व अकोला शहर दोन दिवस धुमसत राहिले. हे धुमसणे महाराष्ट्राच्या सामाजिक प्रकृतीला मानवणारे नाही, पण महाराष्ट्र धुमसत राहावा याचे योजनाबद्ध नियोजन पडद्यामागून सुरू आहे”, असं गंभीर भाष्य ठाकरे गटाने केलं आहे.