'तळपायाची आग मस्तकात गेली...', निवडणुकांच्या 'तारखा' जाहीर झाल्या अन् राज ठाकरेंचा पाराच चढला!
राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचंड संताप व्यक्त करत निवडणूक आयुक्त आणि आयोगावर जहरी टीका केली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज (4 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. या निवडणुका 2 डिसेंबर 2025 रोजी होणार असून, मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होईल. एकीकडे मतदार याद्यांवर आक्षेप घेत विरोधक निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत असताना दुसरीकडे आयोगाने थेट निवडणुका जाहीर केल्याने आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा घोषित केल्यानंतर राज ठाकरेंनी सोशल मीडियावरून तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला थेट सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले म्हटले असून, मतदार याद्यांतील घोळ आणि दुबार नोंदणीवरून आयोगावर कठोर टीका केली.
'...तळपायाची आग मस्तकात गेली', राज ठाकरेंची निवडणूक आयोगावर तीव्र टीका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर अवघ्या काही मिनिटांत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी X वर पोस्ट करून आपला संताप व्यक्त केला. त्यांनी पत्रकार परिषदेचा एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आणि लिहिले, "आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे... दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय?"
राज ठाकरेंनी पुढे असंही लिहिलं की, "महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा... तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल... बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन..."










