'जेव्हा प्रेमाची गरज होती, तेव्हा प्रेमभंग केला..' मुंबई Tak बैठकीत CM फडणवीसांचे ठाकरेंना टोल्यांवर टोले!
मुंबई Tak बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या 'ऑपरेशन फडणवीस' आरोपाला सडेतोड उत्तर दिलं. 2019 च्या सत्तासंघर्षाचा संदर्भ देत 'प्रेमभंग' आणि 'दुसरं लग्न' अशी मिश्किल उपमा देत त्यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
ADVERTISEMENT

मुंबई: ठाकरे गटातील सहा खासदारांच्या पक्षांतर हे ऑपरेशन टायगर नसून ते मुख्यमंत्री फडणवीसांची दिल्लीची वाट अडविण्यासाठी सुरू असलेलं 'ऑपरेशन फडणवीस' असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. याचबाबत 'मुंबई Tak बैठक' कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर मिश्किल शैलीत निशाणा साधत 2019 च्या राजकीय घडामोडींची आठवण करून दिली.
प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "माझं पण मनोरंजन झालं... मी ते ऐकलं. समजा माझा मित्रपक्ष एखादं ऑपरेशन करत असेल, तर मी ते का म्हणून थांबवेन? आणि आमच्यात असं काय प्रेम उरलंय की, जे माझ्यासोबत दिवसरात्र उभे आहेत त्यांना थांबवून, ज्यांनी योग्य वेळी मला साथ देण्याची गरज असताना साथ सोडली, त्यांच्या पाठिशी मी का जावं? काहीच कारण नाही. पॉलिटिकल सर्व्हायव्हलचा विषय त्यांच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही."
'137 आमदारांचा मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा'
यावेळी फडणवीसांनी महायुतीतील समन्वयावरही भाष्य केलं. ते म्हणाले,
"137 आमदार ज्यांच्या पक्षाचे आहेत, त्याच पक्षाचा मुख्यमंत्री राहणार आहे. त्यामुळे सत्य काय आहे, हे मला आणि शिंदे साहेबांना माहिती आहे. कोणी कितीही कहाण्या तयार केल्या तरी त्याने काही फरक पडत नाही. आमच्या दोघांमध्ये योग्य संवाद आहे."
या वक्तव्यातून महायुतीत कोणताही मतभेद नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला.









