Mumbai Tak Baithak: महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकणारी काँग्रेसची 'ती' चूक, ज्येष्ठ संपादकांनी सुनावलं सडेतोड
महाराष्ट्रातील राजकारणाची वाताहत होण्यामागे अनेक कारणं असल्याची चर्चा सध्या आहे जाते. मात्र यामागे काँग्रेसची एक मोठी चूकही कारणीभूत होती. याचबाबत ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर, राजदीप सरदेसाई आणि मिलिंद खांडेकर त्यांची सडेतोड मतं मांडली आहेत.
ADVERTISEMENT

मुंबई: "जर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता, तर महाराष्ट्रातलं राजकारण बदललंच नसतं, तसेच कोणतीही पूर्वतयारी न करता राजीनामा देणं ही काँग्रेसची मोठी चूक होती, असे परखड मत 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले आहे. 'मुंबई Tak बैठक' या विशेष कार्यक्रमात बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील घडामोडींवर भाष्य केले. राज्यातील राजकारणाची दिशा बदलण्यात काँग्रेसचा मोठा हातभार होता, असे सांगत मला कधी कधी प्रश्न पडतो की काँग्रेस हा पक्ष आहे की एनजीओ, असा टोलाही कुबेर यांनी लगावला.
मुंबई Tak बैठक या कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर, राजदीप सरदेसाई आणि मिलिंद खांडेकर यांनी महाराष्ट्रातील राजकारणाबाबत त्यांची मतं मांडत सध्याच्या राजकीय नेतृत्वाचा अत्यंत परखड शब्दात आढावाही घेतला.
'दीर्घकाळ निवड रखडली'
फेब्रुवारी 2021 मध्ये नाना पटोले यांनी काँग्रेस हायकमांडच्या सांगण्यावरून महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. मात्र, गिरीश कुबेर यांनी अधोरेखित केल्याप्रमाणे या एका निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणाला पूर्णपणे वेगळी दिशा दिली आणि महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याला मोठा सुरुंग लागला. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तेव्हा अत्यंत महत्त्वाचे आणि कायदेशीरदृष्ट्या कवच ठरू शकणारे विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे होते. पण पटोलेंच्या राजीनाम्यानंतर हे महत्त्वाचे पद रिक्त झाले पण त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार जाईपर्यंत हे पद रिक्तच राहिलं. दरम्यान, तांत्रिक आणि कायदेशीर पेचप्रसंगांमुळे दीर्घकाळ ही निवड रखडली आणि विधानसभेला पूर्णवेळ अध्यक्ष मिळू शकला नाही. ज्याची परिणिती ही पक्षफुटीमध्ये झाली.
हे ही वाचा>> Mumabi Tak Baithak: देवेंद्र फडणवीसांचं रोहित पवारांनी केलं कौतुक, पण नेमकं कशासाठी?
काँग्रेसच्या चुकीचा फायदा शिंदेंना
या राजकीय घोडचुकीचा सर्वात मोठा फटका जून 2022 मध्ये बसला, जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांसह बंड पुकारले. महाविकास आघाडी सरकारवर जेव्हा संकट आले, तेव्हा विधानसभेत निर्णय घेण्यासाठी हक्काचा आणि पूर्णवेळ अध्यक्ष उपस्थित नव्हता, तर उपअध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे कार्यभार होता. राजकीय विश्लेषकांच्या मते, जर त्यावेळी विधानसभेवर महाविकास आघाडीचा आक्रमक अध्यक्ष असता, तर बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई तातडीने आणि वेगळ्या कायदेशीर चौकटीत करता आली असती, ज्यामुळे बंडखोरांवर दबाव वाढला असता.









