Shalini Patil : “सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करा, अजित पवारांना अटक होऊ शकते”
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कुणाची निवड व्हावी, सुप्रिया सुळे की अजित पवार… शालिनीताई पाटील यांनी सांगितली त्यांची पसंती.
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार कायम राहणार का? पवारांनी निर्णय कायम ठेवला, तर पुढचा अध्यक्ष कोण? राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र अजित पवारांकडे जाणार की, सुप्रिया सुळेंकडे? असे वेगवेगळे प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीत निर्माण झालेल्या या परिस्थितीवर भाष्य करताना माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप करत मोठं विधान केलं आहे.
अजित पवार, जरंडेश्वर साखर कारखाना आणि ईडी प्रकरण
शालिनीताई पाटील म्हणाल्या, “जरंडेश्वर सहकारी सोसायटी एक भाग आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा एक भाग आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याला 2010 ला लिलावाची नोटीस आली. 2007 ते 2010 या काळात शिखर बँकेने महाराष्ट्रातल्या 45 सहकारी साखर कारखान्यांची विक्री केली. अजित पवार त्याचं समर्थन करताहेत कारण ते त्यावेळी शिखर बँकेचे सर्वेसर्वा होते. 70 संचालकांपैकी 57 संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते. बाकीचे नियुक्त आणि काही सरकारचे प्रतिनिधी होते. पण, त्या काळात घेतलेले हे निर्णय, पैशाचं वाटप. या सगळ्यामध्ये अजित पवारांनी अध्यक्षता केलेली आहे.”
हेही वाचा >> नरेंद्र मोदी शिवसेनेपेक्षा ‘राष्ट्रवादी’साठी आग्रही होते; शरद पवारांचा गौप्यस्फोट
“कोर्टाच्या निर्णयामध्ये कोणती बैठक किती तारखेला झाली आणि त्यामध्ये कोण कोण उपस्थित होते, यामध्ये पहिलं नाव अजित पवारांचं आहे. त्यामुळे ते लिलाव झाले. कालपरवा ते बोलले की ते सगळे कारखाने तोट्यात होते. ते तोट्यात असले तरी पुनर्वसनासाठी केंद्र सरकार पैसे द्यायला तयार होतं. महाराष्ट्र सरकारला त्यांनी कळवलं होतं. यादी आणि समस्या कळवा असं सांगितलं होतं. समित्या नेमल्या पण, वेळेत प्रस्ताव पाठवले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असेपर्यंत ते उपमुख्यमंत्री होते”, असंही शालिनीताई पाटील यांनी म्हटलं आहे.
“ईडीच्या कोर्टानं जो निकाल दिला आणि कारखाना ताब्यात घेण्यास सांगितलं. त्यानंतर ईडी आणि आयकरने धाडी टाकल्या. ईडीच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे की, अजित पवारांनी जरंडेश्वर कारखान्यात 1400 कोटींचं मनी लॉड्रिंग केलेलं आहे. गुरू कमोडिटी नावाची संस्था सांगत असले, तरी त्याचे प्रमुख अजित पवार आहेत. 45 पैकी 13 कारखाने अजित पवारांनी वेगवेगळ्या नावाने कंपन्या काढून घेतलेले आहेत. 45 पैकी 90 टक्के कारखाने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलेले आहेत”, असं त्या म्हणाल्या.