rajdeep sardesai : मुंबई तकच्या 'बैठक' कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक राजदीप सरदेसाई, मिलिंद खांडेकर, गिरीश कुबेर आणि साहिल जोशी यांनी सहभाग घेत देशासह महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणावर सखोल चर्चा केली. महाराष्ट्रातील बदलत चाललेले राजकारण, राजकारणातील नैतिकता आणि समाजाची मानसिकता यावर चारही ज्येष्ठ संपादकांनी परखड शैलीत आपली मते मांडली. या चर्चेदरम्यान राजदीप सरदेसाई यांनी सध्याच्या राजकारणातील आर्थिक व्यवहार, सत्तेचे केंद्रीकरण आणि नैतिकतेचा अभाव या मुद्द्यांवर थेट भाष्य करत अनेक प्रश्न उपस्थित केले.
ADVERTISEMENT
'सेव्हन स्टारमध्ये नेते आणि चेलेच..' सरदेसाईंनी केली पोलखोल!
संवादादरम्यान राजदीप सरदेसाई यांनी विधानभवन परिसरातील वातावरणाचा उल्लेख करत ट्रायडंट हॉटेलमध्ये अनेक नेते आणि त्यांचे सहकारी मोठ्या खोल्यांमध्ये वास्तव्यास असल्याचे सांगितले. एवढा पैसा नेमका कुठून येतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देशात मंदी असल्याचे बोलले जात असले, तरी दोन क्षेत्रांमध्ये कोणतीही मंदी नसल्याचे सांगत त्यांनी इंडियन प्रीमियर लीग आणि इंडियन पॉलिटिकल लीगचा उल्लेख केला.
हेही वाचा : जालना : बस थांबवली, मुलीला खाली उतरवलं, पुढे चालकाला मारहाण.. तरुणाने पुढे काय केलं?
सरदेसाई यांनी सरकारी निधीच्या वाटपावरही प्रश्न उपस्थित केले. इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्ताचा संदर्भ देत, मोठ्या प्रमाणावर निधी केवळ महायुतीच्या नगरसेवकांकडे जात असल्याचे त्यांनी नमूद केले. हा पैसा सरकारचा किंवा कोणत्याही पक्षाचा नसून करदात्यांचा असल्याचे सांगत प्रत्येक नगरसेवक आणि आमदाराला समान संधी मिळायला हवी, असे त्यांनी स्पष्ट केले. देशासमोर केवळ महसुली तूट नाही, तर नैतिकतेचीही तूट निर्माण झाली आहे, असे म्हणत त्यांनी राजकारणात येण्यामागील उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पत्रकार म्हणून आम्ही लोकांसमोर देश आणि महाराष्ट्राचे वास्तव मांडण्यासाठी आलो आहोत, मग नेते नेमके कोणत्या उद्देशाने राजकारणात येतात, हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे, असे ते म्हणाले.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात 'या' जिल्ह्यांत पावसाची हजेरी लागणार, हवामान विभागाची अपडेट
"सध्याचे राजकारण सेवा नाही तर मेवा"
यावेळी त्यांनी भाजपवरही भाष्य केले. देवेंद्र फडणवीस यांचा विचारधारेशी संबंध असू शकतो, मात्र त्यांच्या सोबत असलेले सर्वच लोक त्याच विचारधारेमुळे राजकारणात आले आहेत का, असा सवाल त्यांनी केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांपैकी 115 उमेदवार पूर्वी काँग्रेसमध्ये होते, असा उल्लेख करत त्यांनी भाजपचेही काँग्रेसीकरण होत असल्याची टिप्पणी केली. चर्चेदरम्यान पत्रकार आणि राजकारणी यांच्यातील फरक अधोरेखित करत त्यांनी पत्रकारिता हे व्यावसायिक क्षेत्र असले, तरी राजकारणी स्वतःला राष्ट्रसेवा किंवा महाराष्ट्र सेवेच्या उद्देशाने राजकारणात आल्याचे सांगतात, असे नमूद केले. मात्र आज सेवा कमी आणि 'मेवा' अधिक दिसत असल्याची टीका त्यांनी केली. या परखड चर्चेतून महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणासोबतच नैतिकतेवरील प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले.
विकास निधीच्या नावाखाली होणाऱ्या राजकारणावरही त्यांनी भाष्य केले. काही राजकारणी विकास निधी हा लोकांसाठी नव्हे तर स्वतःसाठी हवा असतो, असे उत्तर देतात, असा दावा त्यांनी केला. रस्ते बांधण्यापासून विविध कामांपर्यंत कमिशनचे 'रेट कार्ड' असल्याचा उल्लेख करत, दोन वर्षांनी पुन्हा तोच रस्ता बांधण्याची पद्धत सुरू असल्याची टीकाही मिलिंद खांडेकर यांनी केली.
ADVERTISEMENT












