Rain Update: जगबुडीचा कहर, रत्नागिरी गेलं पाण्याखाली.. पुराचं पाणी पाहून तुम्हालाही भरेल धडकी
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सध्या जोरदार पाऊस बरसत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसंच जगबुडी नदीचं पाणी थेट शहरी भागात घुसल्याने येथील परिस्थिती गंभीर झाली आहे.
ADVERTISEMENT

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि दापोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून, यामुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरीमधील जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे रत्नागिरी शहरातील अनेक नागरी वस्तीत पाणी शिरलं आहे. त्यामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.
रत्नागिरीमधील पुराचे काही व्हिडिओ आणि फोटो हे आता समोर आले असून त्यातून तेथील परिस्थिती किती गंभीर आहे याचा आपल्याला अंदाज लावता येईल. या फोटोंमध्ये दापोली-खेड परिसरातील रस्ते आणि गावांमध्ये पाणी साचलेले दिसत आहे. ज्यामुळे स्थानिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
हे ही वाचा>> नाशिकमध्ये पूर.. धडकी भरवणारी दृश्य, पावसाचं थैमान! पुण्यातही पावसाचा धुमाकूळ
पावसाचा प्रभाव
गेल्या 24 तासांपासून रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि इतर किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे रस्ते वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आल्याने येथे वाहनांची ये-जा थांबली आहे.
याशिवाय अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेषतः खेड बाजारपेठेत जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिसरात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) तैनात करण्यात आले आहे.
हवामान खात्याचा इशारा
भारतीय हवामान खात्याने (IMD) रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस असून, रत्नागिरीमध्येही याचा मोठा फटका बसला आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
हे ही वाचा>> पुण्याची वाट लागली, पावसाचं थैमान.. खडकवासला धरणातून पाणीही सोडलं!
बचाव आणि मदत कार्य
रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचे हेल्पलाइन क्रमांक (011-1078) आणि टेलिफोन (022-22027990) सक्रिय ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून नागरिकांना तातडीची मदत मिळू शकेल.
स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियावर आपली चिंता व्यक्त केली आहे. काहींनी पाणी साचल्यामुळे घरांमध्ये अडकल्याचे सांगितले, तर काहींनी प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
आगामी काळात पावसाचा जोर कमी होईल की वाढेल, याबाबत हवामान खात्याकडून अद्याप स्पष्टता नाही. मात्र, स्थानिक प्रशासनाने पूर नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.