Chandrakant Patil: ‘अरे नाना पटोल्या…’, मंत्री चंद्रकांत पाटलांचा तोल ढळला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Chandrakant Patil Vs Nana Patole: मुंबई: राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या वादग्रस्त विधानावरुन विरोधक त्यांच्यावर सडकून टीका करत आहेत. असं असताना चंद्रकांत पाटलांचा पुन्हा एकदा तोल ढासळल्याचं पाहायला मिळालं आहे. अतिशय आक्रस्ताळेपणानं चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना प्रयुत्तर दिलं आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं. (minister chandrakant patils tongue slipped patil did nana patoles mentioned in singular)

‘भाऊराव पाटील, आंबेडकर, फुलेंनी शाळा सुरु करताना लोकांकडे भीक मागितलेली…’

दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील पैठणमध्ये एका कार्यक्रमात म्हणाले होते की, ‘आपल्याला संत विद्यापीठ सुरु करायचं असेल तर सरकार नक्की मदत करतील. मी आणि संदीपान भुमरे अशा चांगल्या कामाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे गेलो तर पैशांची कमतरता येणार नाही.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘पण माझं म्हणणं आहे की सरकारवर अवलंबून का राहता? या देशात शाळा कोणी सुरु केल्या? शाळा कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली. मला शाळा चालवतोय, पैसे द्या.’ हे विधान करताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातील उपरणं पुढे पसरून दाखवलं.

चंद्रकांत पाटील शाई फेक प्रकरणात समोर आलं ‘बारामती’ कनेक्शन; 13 जणांवर गुन्हा

ADVERTISEMENT

‘चंद्रकांत पाटलांची मानसिकता पेशवाईची’

ADVERTISEMENT

चंद्रकांत पाटलांच्या याच विधानमुळे सध्या राज्यात बराच गदारोळ सुरु आहे. अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. याचबाबत जेव्हा नाना पटोले यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा ते म्हणाले की, ‘माझे मित्र चंद्रकांत पाटील असे नव्हते.. ते असे नव्हते. पण जी शाईफेक झाली तसं व्हायला नको हवं होतं. असे प्रकार महाराष्ट्रात घडू नये ही काँग्रेसची भूमिका आहे.’

‘मात्र आपण पाहिलं की, सातत्याने भाजपच्या वतीने कधी महात्मा फुले, कधी शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बदल केली जाणारी वक्तव्य.. याबाबत भाजपने महाराष्ट्रात एक षडयंत्र उभं केलं आहे. त्यामुळे भाजपचं खरं रुप या निमित्ताने स्पष्ट झालं आहे.’

‘राज्याचे उच्च-तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं कालचं जे काही वक्तव्य आहे ते पेशवाईच्या काळातील जी मानसिकता होती की, बहुजनांनी शिक्षण घेऊ नये, बहुजनांच्या मुला-मुलींना शिक्षण मिळू नये. ही मानसिकता त्या काळातील होती त्या मानसिकतेला झुगारून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्या पद्धतीने शिक्षण व्यवस्था उभ्या करुन बहुजनांच्या मुला-मुलींना शिक्षण दिलं. त्याचा विरोध आजही या पेशवाई विचाराच्या भाजपला खदखदतंय का? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.’ असा बोचरा सवाल नाना पटोलेंनी चंद्रकांत पाटलांना विचारला.

चंद्रकांत पाटील वादाच्या भोवऱ्यात; महापुरुषांवरील वक्तव्यानंतर विरोधकांनी घेरलं

‘अरे नाना पटोल्या…’

दरम्यान, जेव्हा चंद्रकांत पाटलांना नाना पटोलेंची ही प्रतिक्रिया समजली आणि जेव्हा माध्यमांनी याबाबत चंद्रकांत पाटलांचं याबाबत मत विचारलं तेव्हा त्यांचा तोल ढळला. ते मीडियाच्या सर्व कॅमेऱ्यासमोरच म्हणाले की, ‘अरे नाना पटोल्या.. समोर ये माझ्या.. आणि माझ्याशी डिबेट कर ना. की, याच्यात काय चुकलं. माझं संपूर्ण भाषण वारकऱ्यांनी अॅप्रिशेअट केलं. ते पूर्ण अध्यात्मिक होतं. यांना काय कळणार अध्यात्म.. केवळ आणि केवळ राजकारण. नाना पटोले माझे चांगले मित्र आहेत. पण इतकी नका बुद्धी भ्रष्ट होऊ देऊ. इतकं राजकारण नका करु. हा भस्मासूर तुमच्यावरही पलटेल.’

‘उद्या तुमच्यावर कोणी शाई फेकली तर तुम्ही म्हणाल… हो माझ्यावर शाई फेकली.. इकडे फेकली.. इकडे फेकली.. असं करणार काय?’ अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिली.

सध्या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरुन त्यांना आणि भाजपला घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, असं असताना देखील चंद्रकांत पाटील हे विरोधकांच्या हातात आणखी नवनवे मुद्दे देत असल्याने ते अधिक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT