देवेंद्र फडणवीसांच्या हाकेला उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद “…तर फडणवीस आज वर्षा बंगल्यावर असते”
देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या अनौपचारिक चर्चांमध्ये एक वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता खूप वाढली आहे. ही कटुता संपली पाहिजे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी कटुता आल्याचं हे त्यांनी मान्य केलं. त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि सामनाच्या अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक […]
ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या अनौपचारिक चर्चांमध्ये एक वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता खूप वाढली आहे. ही कटुता संपली पाहिजे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी कटुता आल्याचं हे त्यांनी मान्य केलं. त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि सामनाच्या अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.
काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐन दिवाळीत सामोपचाराच्या, शहाणपणाच्या गोष्टी केल्या आहेत. याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मूळ स्वभाव सामोपचाराने मिळून मिसळून वागण्याचाच होता. मात्र सत्ता गेल्यामुळे ते बिघडले. सत्ता येते आणि जाते. माणसाने मूळ स्वभाव बदलण्याची गरज नाही. विजयाचा आनंदा होत असला तरीही नंतर उन्माद चढणे हे प्रौढत्वाचं लक्षण मानलं जात नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यात सत्तांतरापासून प्रौढपणा आला आहे हे जाणवू लागले आहे.
देवेंद्र फडणवीस यांंचं अभिनंदन
दिवाळीनिमित्त पत्रकारांशी जो संवाद देवेंद्र फडणवीस यांनी साधला त्यात दोन महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले. महाराष्ट्राने त्यावर विचार करायला हवा. “महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी कटुता आली आहे” हे देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त कटुताच नाही तर सूडाच्या राजकारणाचे विषारी प्रवाह उसळत आहेत. या प्रवाचं मूळ भाजपच्या अलिकडच्या राजकारणात आहे. या विषाचं अमृत करण्याचं कामही फडणवीस यांनाच करावं लागेल. कारण त्यांना यासारख्या गोष्टीची खंत वाटते आहे.
पुढे देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की “महाराष्ट्राच्या राजकारणातली कटुता राजकीय वैमनस्यापर्यंत गेली आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती असी नाही. राजकीय मतभेद असले तरीही सर्व पक्षांचे नेते एकमेकांशी बोलू शकतात. त्यामुळे ही कटुता कशी कमी करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे.”









