Supriya Sule: ‘पंतप्रधान मोदींनी आमचं मन दुखावलं’, पाहा सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पालघर: ‘पंतप्रधान हे कोणत्याही एका राज्याचे नसून देशाचे पंतप्रधान असतात. पण पंतप्रधान मोदी हे नेहमीच महाराष्ट्र राज्याच्या विरोधात बोलतात. हे दुर्दैवी आहे.’ असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

सुप्रिया सुळे आज (28 एप्रिल) पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.

‘कालच्या बैठकीत पंतप्रधान मोदी कोरोनाबाबत काहीतरी ठोस बोलतील असं वाटत होतं. मात्र तसं न करता त्यांनी सर्व गोष्टी राज्यांवर ढकलून दिल्या. त्यातच पुन्हा एकदा महाराष्ट्र विरोधात बोलून त्यांनी आमचं मन दुखावलं.’ असं म्हणत सुप्रिया सुळे पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत अचानक पेट्रोलच्या मुद्द्यावर भाष्य केलं. तसंच महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी अद्यापही पेट्रोलवरील VAT कमी केलेला नाही असं म्हणत त्यांनी राज्यांना VAT कमी करण्याचे आवाहन देखील केले होते.

याबाबत महाराष्ट्रातील मविआ सरकारने मात्र, थेट आकडेवारी सांगत केंद्र सरकारच्या कराएवढा राज्याचा कर पेट्रोल-डिझेलचा असल्याचं सांगत पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिलं होतं.

ADVERTISEMENT

पाहा पंतप्रधान मोदी पेट्रोल-डिझेलच्या दरांवर नेमकं काय म्हणाले होते:

ADVERTISEMENT

‘युद्धाची जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्याचा परिणाम पुरवठा साखळीवर (Supply Chain) झाला आहे. अशा वातावरणात आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. हे जागतिक संकट अनेक आव्हाने घेऊन येत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्यांमधील समन्वय अधिक वाढवणे अत्यावश्यक झाले आहे.’

‘लोकांवरचा बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर राज्य सरकारांनाही व्हॅट कमी करण्यास सांगण्यात आले. काही राज्यांनी केंद्राचं म्हणणं ऐकून जनतेला दिलासा दिला, मात्र काही राज्यांनी तसे केले नाही.’

‘महाराष्ट्र, (Maharashtra) पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड आणि तामिळनाडू या राज्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने केंद्र सरकारचे म्हणणे ऐकले नाही आणि त्या राज्यांतील नागरिकांवर अतिरिक्त बोजा पडत राहिला. आता व्हॅट कमी करून आपण त्याचा लाभ नागरिकांना द्यावा.’

वरील राज्यांनी व्हॅट कमी न केल्याने सध्या त्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती इतर राज्यांपेक्षा जास्त असल्याचं पीएम मोदींनी म्हटलं होतं.

पाहा मोदींच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काय दिलं होतं प्रत्युत्तर

पंतप्रधानांनी कोविडविषयक बैठकीत पेट्रोल व डिझेल वरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत, असा आरोप केला. मात्र महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत जी सापत्न वागणूक दिली जात आहे, त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांना वस्तुस्थिती कळावी म्हणून हे स्पष्ट करणे आवश्यक आहे.’

PM Modi: ‘पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी कराच’, PM मोदींनी महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना सुनावलं!

‘महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात ( डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र केले तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. असे असूनही आजही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे.’ असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.

‘मुंबईत एक लिटर डिझेलच्या दरामध्ये २४ रुपये ३८ पैसे केंद्राचा तर २२ रुपये ३७ पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे केंद्रीय कर तर ३२ रुपये ५५ पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले आहे हि वस्तुस्थिती नाही.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना थेट सुनावलं होतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT