राज्यसभा निवडणूक : ‘ट्रायडंट’मधील बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांना काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) तीनही पक्षाने आपल्या सर्व आमदारांची मुंबईतील ‘ट्रायडंट’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार बैठकीला हजर होते. याच बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया देताना भाजपला जोरदार टोलाही लगावला आहे. तसंच आपल्या सर्व आमदारांना एकजुटीने राहण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले:

‘कोणी कितीही प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार नक्कीच निवडून येणार. खरंतर विचित्र गोष्ट आहे. आतापर्यंत एक परंपरा राहिलेली आहे बिनविरोध निवडणुकीची. सभ्यता आणि राजकारण तशा परस्परविरोधी गोष्टी आहेत पण राजकारणात थोडी सभ्यता असायला हरकत नाही. आता जवळजवळ चोवीस-पंचवीस वर्षांनी राज्यसभेची निवडणूक होत आहे. पण परंपरा पाळायला काहीच हरकत नव्हती.’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, यावेळी पत्रकारांनी आमदारांना काय सांगितलं? असा प्रश्न विचारला त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की. ‘असं सांगण्यासारखं असतं तर तुम्हाला आतमध्ये बोलावलं असतं. पण कोणी कितीही प्रयत्न करु दे मात्र महाविकास आघाडीचे चारी उमेदवार निवडून येतील असा मला विश्वास आहे.’

बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे आमदारांना काय म्हणाले?

ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांची जी बैठक पार पडली त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभा निवडणुकीबाबत आमदारांना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याशी चर्चा केली.

ADVERTISEMENT

एका खासदारासाठी भाजप-शिवसेना करणार लाखो रुपयांची उधळण, ट्रायडंट-ताजमधील भाडे फक्त…

ADVERTISEMENT

यावेळी मुख्यमंत्री आमदारांना एवढंच म्हणाले की, ‘मतदान करताना काळजी घ्या.. आपलं ऐक्य दाखवा. आपण यापुढे देखील किमान समान कार्यक्रमावर अधिक भर देऊ. पण एक लक्षात ठेवा आपल्याला सत्तापिपासू लोकांना सत्तेपासून दूर ठेवायचं आहे. आपली संख्या जास्त आहे. त्यामुळे आपले उमेदवार निवडून येतील आणि आपण पार्टी करु.’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत म्हणाले.

12 अपक्ष आमदार उपस्थित

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मविआच्या ट्रायडंटमधील बैठकीला 12 अपक्ष आमदार उपस्थित आहेत. जी मविआसाठी दिलासादायक बाब ठरली आहे. कारण राज्यसभा निवडणुकीत सहावा उमेदवार निवडून येण्यासाठी मविआची सगळी भिस्त ही अपक्ष आमदारांवर असणार आहे. त्यामुळेच 12 अपक्ष आमदारांची हजेरी ही मविआसाठी दिलासादायक बाब ठरली आहे.

  • राजेंद्र यड्रावकर

  • आशिष जैस्वाल

  • किशोर जोरगेवर

  • देवेंद्र भुयार

  • गीता जैन

  • मंजुळा गावित

  • श्यामसुंदर शिंदे

  • नरेंद्र भोंडेकर

  • संजय मामा शिंदे

  • चंद्रकांत पाटील

  • विनोद अग्रवाल

  • शंकरराव गडाख

हे अपक्ष आमदारही या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला हजर होते. या बैठकीच्या माध्यमातून मविआने आपली ताकद पुन्हा एकदा विरोधकांना दाखवून दिली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT