2000 Note Ban : “विरोधकांना अडचणीत आणण्याचा हेतू”, मोदींवर ठाकरेंचे पुन्हा ‘बाण’
आरबीआयकडून याची घोषणा करण्यात आल्यानंतर विरोधक मोदी सरकारवर या निर्णयाचं खापर फोडताना दिसत आहे. ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून मोदींवर पुन्हा एकदा टीकेचे बाण डागले आहेत.
ADVERTISEMENT

2000 Note Ban : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 ची नोट व्यवहारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयकडून याची घोषणा करण्यात आल्यानंतर विरोधक मोदी सरकारवर या निर्णयाचं खापर फोडताना दिसत आहे. ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून मोदींवर पुन्हा एकदा टीकेचे बाण डागले आहेत. “देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे खड्डय़ात घालण्याचा चंगच मोदी यांनी बांधलेला दिसतोय”, असं म्हणत ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावले आहेत. (Shiv Sena UBT hits out at narendra modi over 2000 Note withdrawn from circulation)
2000 ची नोट परत घेण्याच्या निर्णयावर भाष्य करताना सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “भारतीय अर्थव्यवस्थेचा जो खेळखंडोबा सुरू आहे, त्यास इतिहासात तोड नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून तडकाफडकी बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या नोटाबंदीचा खटका पंतप्रधान मोदी यांनी स्वतः वृत्तवाहिन्यांवर येऊन दाबला. पाचशे आणि एक हजारच्या नोटा त्यांनी चलनातून बाद केल्या व एकच हाहाकार उडाला. मोदी रात्री आठ वाजता टीव्हीवर प्रकट झाले व दुसऱ्या दिवसापासून त्यांनी संपूर्ण देशाला ‘नोटा’ बदलण्यासाठी बँकांच्या रांगेत उभे केले. त्या रांगेत देशभरात चार हजारांवर माणसे मरण पावली व नोटाबंदीचा काडीचाही फायदा झाला नाही.”
हेही वाचा >> Aryan Khan drugs case : समीर वानखेडेंचा 25 कोटी खंडणीचा डाव एका फोटोने उधळला! वाचा इनसाईड स्टोरी
पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदीची घोषणा करताना त्यामागील उद्देश सांगितले होते. त्यावरही ठाकरे गटाने बोट ठेवलं आहे. “लहान उद्योग, छोटे व्यापारी देशोधडीस लागले. नोकऱ्या गेल्या. काळा पैसा बाहेर येईल, असे मोदी म्हणाले. उलट काळा पैसा जास्तच वाढला. दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा नोटाबंदीमुळे थांबेल असा त्यांचा दावा होता. प्रत्यक्षात उलटेच झाले. मोदींनी हजाराची नोट चलनातून बाद केली व दोन हजारांची गुलाबी नोट आणली. त्यामुळे हजार-पाचशेत होणारी लाचखोरी दोन हजारांच्या नोटेत पोहोचली, हेच नोटाबंदीचे फायदे. आता मोदींनी ‘लहर’ आली म्हणून दोन हजारांची नोटही बाद केली. हा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केला.”
विरोधकांना अडचणीत आणण्याचा हेतू
“आपल्या देशातील न्यायालये, घटनात्मक संस्था, निवडणूक आयोग जेथे स्वतंत्र आणि निष्पक्ष राहिले नाहीत, तेथे ‘भारताची रिझर्व्ह बँक’दोन हजारांच्या नोटांबाबत स्वतंत्र निर्णय घेऊ शकेल काय? दोन हजारांच्या नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे राजकीय आहे. पहिल्या नोटाबंदीच्या वेळी ज्या उदात्त भावनेने नोटाबंदी लादली, तोच प्रकार आता आहे. विरोधी पक्षांकडे 2024 च्या दृष्टीने थोडेबहुत दोन हजारांच्या नोटांचे चलन राखून ठेवले असेल तर ते बाद व्हावे व विरोधी पक्ष त्यादृष्टीने अडचणीत यावा यापेक्षा दुसरा हेतू असू शकत नाही”, असा गंभीर आरोप ठाकरे गटाने या निर्णायावरून मोदी सरकारवर केला आहे.