राज्यातील 38 कारखान्यांनी एफआरपीचे 140 कोटी थकवले, खुद्द सहकार मंत्र्यांच्या कारखान्याचे 9 कोटी थकीत
Maharashtra Politics : राज्यात 38 कारखान्यांनी थकवले एफ आर पी चे 140 कोटी रुपये, पैसे थकवणाऱ्या कारखान्यांमध्ये सहकार मंत्र्यांच्या ही कारखान्याच्या समावेश;सहकार मंत्री बाबसाहेब पाटील यांच्या कारखान्याने 9 कोटी रुपये थकवले असल्याची माहिती समोर
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात 38 कारखान्यांनी एफआरपीचे 140 कोटी थकवले
सहकार मंत्र्यांच्या कारखान्याचेही 9 कोटी थकीत
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेली एफ.आर.पी. (न्यूनतम हमी किंमत) वेळेत न मिळण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यातील तब्बल 38 साखर कारखान्यांनी एकूण 140 कोटी रुपयांचे एफ.आर.पी. थकवले असल्याची धक्कादायक माहिती साखर आयुक्तालयाच्या अहवालातून समोर आली आहे. या यादीत अनेक सहकारी व खाजगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. मात्र, विशेष म्हणजे स्वतः राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मालकीच्या सिद्धी शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज या कारखान्याकडूनही जवळपास 9 कोटी रुपयांची एफ.आर.पी. थकबाकी असल्याचे उघड झाले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तसेच शेतकरी संघटनांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
एफ.आर.पी. हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मूलभूत हक्क मानला जातो. कापणी–वाहतूक खर्च वजा न करता ऊसाच्या भावाची निश्चिती करण्यात येते. नियमांनुसार, कारखान्याने ऊस खरेदी केल्यानंतर 14 दिवसांच्या आत एफ.आर.पी. अदा करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक कारखान्यांकडून हा नियम पाळला जात नसल्याचे उघड झाले आहे.
साखर आयुक्तालयाच्या नुसार, थकबाकी असलेल्या 38 कारखान्यांवर पुढील कारवाईचा प्रस्ताव विचाराधीन आहे. शेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्या कारखान्यांवर दंड, व्याज आकारणी, लाइसन्स रद्द करणे, तसेच पुढील हंगामासाठी परवानगी न देणे अशा उपाययोजनांवरही विचार सुरू आहे.
दरम्यान, सहकार मंत्र्यांच्या कारखान्यानेच पैसे थकवले असल्याने वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी संघटनांनी यावर टीकास्त्र सोडत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून थकीत रकमेची वसुली करावी, अशी मागणी केली आहे.










