'ही आहे जमीन चोरी', पार्थ पवारांचा जमीन व्यवहार अन् राहुल गांधींच्या ट्वीटने खळबळ
पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणानंतर सध्या राजकीय वातावरण बरंच तापलं आहे. अशावेळी आता काँग्रेस नेते राहुल गांधींनी ट्वीट करून जोरदार टीका केली आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील एका मोठ्या जमीन घोटाळ्यावरून ट्वीट करून मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांच्या ट्वीटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित असलेल्या पुण्यातील एका जमीन व्यवहारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या ट्वीटने राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राहुल गांधींचे ट्वीट आणि आरोप
या ट्वीटमध्ये राहुल गांधींनी पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील 1800 कोटी रुपयांच्या किंमतीची सरकारी जमीन केवळ 300 कोटी रुपयांत खरेदी केल्याचा आणि स्टँप ड्यूटी हटविण्यात आल्याचा आरोप केला आहे.
राहुल गांधींनी या घोटाळ्याला 'जमीन चोरी' असे संबोधून महाराष्ट्रातील 'वोट चोरी'शी जोडले आहे, ज्यात ते मोदी सरकारच्या मौनावर प्रश्न उपस्थित करत आहेत.
नेमका जमीन घोटाळा काय?
हे प्रकरण पुण्यातील एका मोठ्या जमीन व्यवहाराशी संबंधित आहे. सरकारी अहवालानुसार, पुण्यातील अमेडिया कंपनीने, ज्यात पार्थ पवार हे संचालक आहे. त्या कंपनीने 1800 कोटी रुपयांची सरकारी जमीन केवळ 300 कोटी रुपयांत खरेदी केली.










