राजीनाम्याबाबत शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय, अजितदादांनी सांगितला नेमका निरोप!
शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर विचार करण्यासाठी दोन-तीन दिवस हवे आहेत असा निरोप अजित पवार यांच्याकडे पाठवला आहे. तसेच कार्यकर्त्यांना देखील घरी जाण्याचं आवाहन केलंय.
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्र्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मुंबईसह राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ माजली. शरद पवारांनी अचानक दिलेला हा धक्का अनेकांना अनपेक्षित होता. त्यामुळे राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. तर पवारांच्या निर्णयानंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनाही आपले अश्रू आवरले नाही. यामुळे या सगळ्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन अखेर आता शरद पवार यांनी पुन्हा एक मोठा निर्णय घेतला आहे. (sharad pawar has taken a big decision regarding resignation what ajit Pawar said)
शरद पवार यांनी आपला निवृत्तीची निर्णय जाहीर केल्यानंतर यशवंतराव प्रतिष्ठानमधील सभागृहात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना त्यांचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची विनंती केली. साधारण दोन तास हा सगळा प्रकार सुरू होता. पण घेतलेल्या निर्णयावर शरद पवार यांनी कोणतंही भाष्य न करता ते सिल्व्हर ओककडे रवाना झाले.
यानंतर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी काही काळ बैठक केल्यानंतर हे सगळे नेते सिल्व्हर ओकवर रवाना झाले. इथे सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याशी तासभर चर्चा केली आणि त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. या चर्चेनंतर शरद पवार यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. जो सांगण्याची जबाबदारी ही अजित पवार यांच्यावर सोपविण्यात आली.
याचबाबत अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं की, ‘पवार साहेब म्हणाले की, तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर मला विचार करायला 2 ते 3 दिवस लागतील. मला दोन ते तीन दिवस द्या.’ म्हणजेच शरद पवार हे आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर तात्काळ निर्णय घेणार नसल्याचं सध्या तरी स्पष्ट झालं आहे.










