NCP: अजितदादांना ठणकावलं; शरद पवारांचं ‘ते’ भाषण जसंच्या तसं!
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवार यांनी जबरदस्त भाषण केलं. वाचा शरद पवार यांचं संपूर्ण भाषण.
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) ऐतिहासिक बंड झालं असून त्याविरोधात वयाच्या 83 व्या वर्षी देखील शरद पवार (Sharad Pawar) हे दंड थोपटून ठामपणे उभे राहिले आहेत. आज (5 जुलै) झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या जरी कमी असली तरी आपण अद्यापही उमेद हरलेलो नाही आणि हरणार नाही हेच शरद पवार यांनी आपल्या भाषणातून आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. यावेळी शरद पवारांनी अतिशय तडाखेबंद असं भाषण केलं. वाचा शरद पवारांचं भाषण जसंच्या तसं.. (sharad pawar powerful speech ncp meeting yashwantrao chavan center mumbai full speech criticized ajit pawar maharashtra political news live)
शरद पवारांचं भाषण जसंच्या तसं
आजची बैठक ऐतिहासिक आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या बैठकीकडे आहे. संपूर्ण देशात चर्चा आहे की, 24 वर्षांपूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. षण्मुखानंदमध्ये बैठक झाली आणि शिवाजी पार्कवर मोठी सभा झाली. 24 वर्षात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेतृत्वाची फळी उभी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं.
कुणी खासदार झालं, कुणी आमदार झाले. मंत्री झाले. सामान्य कुटुंबातील मुलगा राजशकट चालू शकतो हे राष्ट्रवादीने दाखवून दिलं. महाराष्ट्रातील शेवटच्या माणसांमध्ये प्रकाश कसा येईल, याची काळजी घेतली. त्यात यशस्वी झालोय. आपल्याला पुढे जायचं आहे. संकट खूप आहेत.
ज्यांची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही, त्यांच्या हातात देशाची सुत्रं आहेत. त्यांच्या पुढं त्यांच्या सहकाऱ्यांनाही मनातील कल्पना मांडण्याच्या मर्यादा आहे. मी अनेकांच्या सरकारांमध्ये मंत्री म्हणून काम केलंय. दिल्लीत विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. त्या सगळ्यांच्या कामाची पद्धत बघितली. एखादी गोष्ट बरोबर नसेल, तर जनतेची भावना वेगळी असेल, तर त्यासंबंधी सुसंवाद साधणं त्यातून मार्ग काढणं हे सुत्रं या देशात अनेक वर्षांपासून सुरू आहे.
आज संवाद संपला आहे. लोकशाहीत विरोधक असो वा सहकारी, यांच्यात सुसंवाद असायला हवा. मी मुख्यमंत्री असताना माझी पद्धत होती की, एखादा महत्त्वाचा निर्णय आपण घेतला की, त्याबद्दल सामान्य माणसाची काय प्रतिक्रिया आहे, हे जाणून घ्यायचं असेल, तर संवाद ठेवावा लागतो. ऐकून घ्यावं लागतं. अयोग्य असेल, दुरुस्त करण्याची भूमिका ठेवावी लागते.
आज देशात संवाद नाही. आम्ही सगळे सत्ताधारी पक्षात नाहीये. पण, लोकांच्या मध्ये आहोत. त्यामुळे कधीकाळी दुःखाची स्थिती समजते. त्यातून मार्ग काढण्याची इच्छा असते. पण, कार्यकर्त्यांचा आणि सहकाऱ्यांचा संवाद नसेल तर या सगळ्या गोष्टींवर मर्यादा येतात. देशातील जनतेमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे.