“नकली वाघांचा एक मिंधे प्रयोग”, शिवसेनेने (UBT) वर्धापन दिनी शिंदेंना काय दिला इशारा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

uddhav thackeray warned eknath shinde. many leaders came and go but shiv sena not finished.
uddhav thackeray warned eknath shinde. many leaders came and go but shiv sena not finished.
social share
google news

shiv sena foundation day : महाराष्ट्रात 2022 मध्ये झालेल्या बंडानंतर एकाच दिवशी दोन राजकीय पक्षाचा वर्धापन दिनी साजरा होण्यास सुरूवात झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना. याच निमित्ताने ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंच्या शिवसेनेवर भाष्य करताना टोले लगावले आहेत. ‘डरकाळीची 57 वर्षे!’ असा अग्रलेख सामनात प्रसिद्ध झाला असून, त्यात एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांवर ठाकरेंनी प्रहार केला आहे. (Shiv Sena Foundation Day : Uddhav Thackeray Vs Eknath Shinde)

“शिवसेना 57 वर्षांची झाली हा एक चमत्कार म्हणावा लागेल. स्थापनेपासून शिवसेना संकटाचा आणि फाटाफुटीचा सामना करीत आहे; पण कोणी कितीही बेइमानी केली तरी ‘सामना’ शिवसेनाच जिंकत आली व सर्व महाराष्ट्रद्रोही कचरा उडावा तसे उडून गेले. हा आजचा वर्धापन दिन खासच म्हणावा लागेल. वर्षभरापूर्वी याच काळी शिवसेनेतील 40 बेइमानांनी आईच्या दुधाशी गद्दारी केली. ते भाजपास सामील झाले व ‘आम्हीच खरी शिवसेना’ असे मिरवू लागले. अर्थात शिवसेनेच्या स्थापनेपासून असे प्रतिशिवसेना स्थापणारे आले आणि काळाच्या ओघात नष्ट झाले”, असं भाष्य अग्रलेखातून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिंदे आणि 40 आमदारांबद्दल केले आहे.

ठाकरे विरुद्ध शिंदे : अग्रलेखात काय?

– “पुराण काळात प्रतिसृष्टी निर्माण झाली. प्रतिशिर्डी, प्रतिबालाजी वगैरे गमतीजमती सुरूच असतात; पण सोन्यापुढे लोखंड कसे टिकणार? चोरलेल्या आमदार, खासदारांचा आकडा म्हणजे वैचारिक बैठक नव्हे. शिवसेनेच्या जडणघडणीत, पर्यायाने महाराष्ट्राच्या जडणघडणीत तुमचे योगदान काय? शिवसेना स्थापन झाली तेव्हा तुम्ही गोधड्या भिजवत होता. आता म्हणे ‘आम्हीच शिवसेनेचे निर्माते!’ हा असा आव आणणाऱ्यांच्या कमरेवरची वस्त्रं दिल्ली दरबारी उभे राहताच भीतीने भिजतात.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> मोदी, शाह, फडणवीस; उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात फुंकले रणशिंग, शिवसैनिकांना काय दिला मेसेज?

– “यांचे नेते मोदी आणि शाह, जे महाराष्ट्राच्या अस्मितेचा पायाच उखडून टाकायला निघाले आहेत. तर हे प्रतिवालेही त्यांच्या प्रतिशिवसेनेचा म्हणे वर्धापन दिन साजरा करीत आहेत. अशा ‘प्रति’ मंडळांच्या मनगटात ना ताकद
ना छातीत स्वाभिमानाचा हुंकार आणि जिद्द. सर्व खेळ पैशांचा. दिल्लीच्या चरणी थैल्या वाहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवणारे शिवसेनेचे नाव घेतात तेव्हा शिवसेनेसाठी रक्त सांडणारे असंख्य आत्मे चिडून तडफडत असतील.”

“गद्दार लांडग्यांना…”

-“शिवसेना ही वाघाची डरकाळी आहे. 57 वर्षे ती घुमतच आहे. ही डरकाळी घुमू नये यासाठी आजवर का कमी प्रयत्न झाले? गद्दार लांडग्यांना वाघाचे कातडे पांघरून नकली वाघ बनविण्याचे प्रयोग महाराष्ट्रात अनेकदा झाले; पण ते सगळे प्रयोग मराठी माणसानेच बंद पाडले. ना प्रयोग चालले, ना त्याचे लेखक-दिग्दर्शक-नेपथ्यकार यांचे नामोनिशाण राहिले.”

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “…म्हणून उद्धव ठाकरेंचे दुकान बंद पाडलं”, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण

– “आताही 40 गद्दार आणि खोकेबहाद्दरांची पात्रे गोळा करीत महाराष्ट्रात नकली वाघांचा एक ‘मिंधे प्रयोग’ जनतेच्या माथी मारण्यात आला आहे. जनतेने या प्रयोगाकडे पाठ फिरवली असली तरी ही 40 पात्रे स्वतःच स्वतःला नाचवून घेत आहेत. शेवटी ईडी सरकारच्या खाल्लेल्या मिठाला जागायला हवे. त्यासाठी ‘मिंधे’पणाचा आणि ‘गद्दारी’चा वर्धापन दिन साजरा करायलाच हवा. या उत्सवाची उचकी म्हणजेच डरकाळी असा आभास निर्माण करायला हवा. हा आभास म्हणजे उसने अवसान आहे हे महाराष्ट्रातील शेंबडे पोरदेखील सांगेल.”

ADVERTISEMENT

“उधारीच्या मालावर मिंधे गटाची राजकीय दुकानदारी”

– “ईडी सरकार आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या ‘उधारी’च्या मालावर या ‘मिंधे’ गटाची राजकीय दुकानदारी सुरू आहे. पुन्हा घटनातज्ञांपासून न्यायालयांपर्यंत सर्वांनी या ‘मिंधे’ वाघांना नकली आणि बेकायदा ठरवले आहे. त्यांचे वाघाचे कातडे ओरबाडून काढले आहे. मात्र राजकीय दुकानदारी सुरू ठेवायची तर ‘नक्कल’ करायलाच हवी. ‘साव’ बनून ‘आव’ आणायलाच हवा. मिंधे गटाची ही राजकीय मजबुरी आहे. त्या मजबुरीतूनच खऱ्या वाघाची नक्कल करण्याची, स्वतःला विचारांचे वारसदार वगैरे म्हणवून घेण्याची नौटंकी सुरू आहे. पण शेवटी नकली ते नकली आणि असली ते असली! गद्दार ते गद्दार आणि खुद्दार ते खुद्दारच!”

Video >> उद्धव ठाकरे यांच्या सभेत रश्मी ठाकरे आल्यावर काय झालं?

– “महाराष्ट्रातील जनता खुद्दार कोण आणि महाराष्ट्रधर्माच्या पाठीत खंजीर खुपसणारे गद्दार कोण हे ओळखते. महाराष्ट्राचा खरा वाघ आणि महाराष्ट्राशी बेइमानी करणारे ‘मिंधे’ वाघ यातील फरक जनता ओळखून आहे. डरकाळी फोडतो तो वाघ असतो आणि ओरडतो तो लांडगा. महाराष्ट्रात सध्या डरकाळीच्या नावाखाली गद्दार लांडग्यांचे पिचकणे सुरू आहे. असे अनेक कोल्हे-लांडगे मागील 57 वर्षांत महाराष्ट्राच्या वाघाने शिकार करून फस्त केले आहेत.”

“हे दळभद्री उद्योग शिवसेनेच्या रक्तात नाही”

“महाराष्ट्रात गेली 57 वर्षे वाघाचीच डरकाळी घुमत आली आहे आणि घुमत राहणार आहे. महाराष्ट्रातील मिंध्या कोह्या-लांडग्यांचे केकाटणे वाघाच्या डरकाळीत विरून जाणार आहे. शिवसेना ही मर्द मावळ्यांची भगवद्गीता आहे. आज मा. बाळासाहेब शरीराने आपल्यात नाहीत, पण त्यांचा अंगारी विचार हाच आपला अग्निपथ आहे. खरी शिवसेना तीच, जिच्या पोटात एक ओठात दुसरे नाही. ओठात एक व पोटात भलतेच हा दांभिक कावा शिवसेनेस ठाऊक नाही. इथे सकाळी निष्ठेच्या आणाभाका घ्यायच्या व रात्रीच्या अंधारात सुरतचा ढोकळा खायला पळून जायचे हे दळभद्री उद्योग शिवसेनेच्या रक्तात नाहीत. शिवसेना 57 वर्षांची झाली व तिची घोडदौड यापुढेही सुरूच राहील ती याच प्रामाणिकपणामुळे. मग कितीही मांजरे आडवी येऊ द्या!”, असं शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT