’70 कोटींचं काय झालं’, उद्धव ठाकरे तापले! ‘कलंक’वरून मोदींवरही चढवला हल्ला
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा नागपूरसाठी कलंक असा उल्लेख केला आणि वादाची ठिणगी पडली. हा वाद आता वाढला असून, भाजपकडून ठाकरेंवर टीकेची झोड उठवण्यात आलीये.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : कलंक नावाचा चित्रपट फ्लॉप झाला, पण कलंक शब्दाने महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलंच वादळ उठवलंय. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा नागपूरसाठी कलंक असा उल्लेख केला आणि वादाची ठिणगी पडली. हा वाद आता वाढला असून, भाजपकडून ठाकरेंवर टीकेची झोड उठवण्यात आलीये. याच मुद्द्यावरून ठाकरे तापले आणि त्यांनी भाजपला उलट सवाल केला.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाल्या, “त्याचं एवढं लागण्यासारखं काय, ज्यांना माझा शब्द लागला. त्यांना मला विचारायचं की, तुम्ही दुसऱ्यांवर भ्रष्टाचार आरोप करता तेव्हा तुम्ही कलंक लावत नाही का? तू भ्रष्ट आहेस, तुझं कुटुंब भ्रष्ट आहे, तो भ्रष्टाचाराचा कलंक तुम्ही लावत नाही का?”, असा सवाल ठाकरेंनी केला.
मुश्रीफांवर आधी आरोप, नंतर मंत्रिमंडळात स्थान
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “हसन मुश्रीफांच्या पत्नीने रस्त्यावर येऊन आक्रोश केला होता. अशा धाडी टाकण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घालून ठार करा. मग तेच मुश्रीफ त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. आम्हाला जे बोलत होते की, बाळासाहेबांना अटक करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात. मला आज कळलं की यांनाही मांडी आहे. तुम्ही म्हणाल तो माणूस भ्रष्ट आणि तुम्ही त्याला मंत्रिमंडळात स्थानही देता. मग तो भ्रष्ट आहे की, देव आहे? तुम्ही म्हणाल तो भ्रष्ट आणि तुम्ही म्हणाल तो देव, हे कुठलं हिंदुत्व?”, असा प्रश्न ठाकरेंनी फडणवीस आणि भाजपला केला.
वाचा >> Sanjay Mishra: मोदी सरकारला झटका! सु्प्रीम कोर्टाने निर्णय ठरवला बेकायदेशीर
“भ्रष्टाचाराचे आरोप करून त्या माणसांना त्यांच्या कुटुंबांना कलंकित करता. पुन्हा मंत्रिमंडळात घेता. मग ते भ्रष्टाचाराचे आरोप खोटे होते का? मग भ्रष्टाचाराचा कलंक का लावला? माझ्या बोलण्यामुळे कळलं की त्यांनाही थोडं मन आहे”, असा चिमटाही ठाकरेंनी यावेळी काढला.